अकोला - सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून वितरित होणारी "अंत्योदय' व "बी.पी.एल.' कार्डधारकांची साखर पाच रूपयांनी महागली आहे. याआधी 15 रूपये प्रतिकिलोनी या साखरेचे वितरण करण्यात येत होते.
परंतु नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधी 14 जून रोजी काढलेल्या नवीन आदेशाने आता दोन्ही योजनेच्या कार्डधारकांना 20 रूपये प्रतिकिलोनी रेशनच्या साखरेचे वितरण करण्यात येईल.
सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने पुरवठा विभागाच्या देखरेखी खाली रेशनच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. सरकारकडून अनुदानावर मिळणारे तांदूळ, गहू व विशेष वेळी मिळणारे तेल व साखरेचे वितरण जिल्ह्यातील एक हजार 53 रेशन दुकानाच्या माध्यमातून करण्यात येते. सणासुदीला गरिबांना अल्प किंमतीत साखर उपलब्ध व्हावी यासाठी सरकारमार्फत जुलै 2014 पासून खुल्या बाजारातून साखर खरेदी करून प्रतिव्यक्ती 500 ग्रॅम या प्रमाणे साखरेचे वितरण करण्यात येत होते. त्यासाठी केंद्राकडून 18 रूपये 50 पैसे प्रतिकिलो अनुदान मिळत होते. परंतु केंद्र सरकारने आता रेशनच्या साखर वितरण पद्धतीमध्ये बदल केला आहे. त्यानंतर्गत 12 मे 2017 रोजीच्या पत्रान्वये फक्त अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रती कुटुंब एक किलो या प्रमाणे नियतन मंजूर केले आहे. या नियतासाठी प्रतिकिलो 18 रूपये 50 पैसे इतके अनुदान केंद्राकडून देण्यात येणार आहे. दरम्यान राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वितरित करावयाच्या साखरेसंदर्भात निर्णय घेऊन राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील "बी.पी.एल.' आणि "अंत्योदय' लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती 500 ग्राम साखरेचे वितरण करण्याऐवजी प्रती कुटुंब एक किलो दरमहा याप्रमाणे साखर वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे साखरेचा विक्रीदर 15 रूपयांऐवजी 20 रूपये प्रतिकिलो करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याप्रमाणेच राज्यातील अंत्योदय व बी.पी.एल. कार्डधारकांना आता रेशन दुकानांतून20 प्रती किलो दराने साखर घ्यावी लागणार आहे.
|