नागपूर - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्य सरकाराला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याने मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करणेच योग्य राहील, असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 82, तर शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आलेत. सत्ता स्थापन करण्यासाठी किमान 115 नगरेसवकांशी गरज आहे. त्यामुळे भाजप-सेनेला युतीशिवाय पर्याय नाही. दोन्ही पक्षांचा अजेंडा एकच आहे. दोघांची नैसर्गिक मैत्री आहे. मागील पंचेवीस वर्षांपासून दोघांची युती आहे. यामुळे सेना-भाजपने पुन्हा एकत्र यावे, असा सल्लाही गडकरी यांनी दिला. राज्यातही भाजप आणि शिवसेनेची युती आहे. शिवसेनेचे आमदार मंत्री आहेत. राज्यात एकत्र असताना मुंबईत एकमेकांच्या विरोधात उभे राहणे योग्य दिसणार नाही. जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. कॉंग्रसने मुंबईत शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहे. शिवसेनेमार्फत वाटाघाटी सुरू असल्याचे कळते. मात्र, कॉंग्रेसचा मूळ हेतू राज्याला अस्थिर करण्याचा आहे. दोन्ही कॉंग्रेस संधीची वाट बघत आहे, यापासून शिवसेनेने सावध राहावे असाही इशारा गडकरी यांनी दिला.
|