वीज ग्राहकांना अभयदान

Mahavitaran
Mahavitaran

चंद्रपूर - कोट्यवधींच्या थकबाकीने अडचणीत सापडलेल्या महावितरण कंपनीने आता वसुलीसाठी नवी युक्ती लढविली आहे. अभय योजनेअंतर्गत थकबाकीदारांकडील व्याज आणि विलंब आकार माफ करण्यात येणार आहेत. मात्र, या योजनेला थकबाकीदार कसा प्रतिसाद देतात, याकडे महावितरणचे लक्ष लागले आहे.

वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची राज्यभरात मोठी संख्या आहे. त्यात औद्योगिक ग्राहकांची संख्या सर्वांत जास्त आहे. त्यांना वारंवार सूचना, नोटिसा दिल्यानंतरही वीजबिलांची रक्कम वसूल झाली नाही. महावितरणने आता औद्योगिक थकबाकीदारांसाठी १ जून ते ३१ ऑगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठीच अभय योजना सुरू केली आहे. 

ज्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे, अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १०० टक्‍के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. १ जुलै २०१८ ते ३१ ऑगस्ट २०१८ या दरम्यान ग्राहकाने मूळ थकबाकीची रक्कम व व्याजाची २५ टक्‍के रक्कम भरली; तर उर्वरित ७५ टक्‍के व्याज व १०० टक्‍के विलंब आकाराची माफी मिळेल. 

ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख, नेट पेमेंट अथवा धनादेशाच्या माध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल.

नागपूर विभागात 6 कोटी 45 लाखांची थकबाकी
नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील पाच हजार १५७ वीजग्राहकांना याचा लाभ होणार आहे. वरील वीजग्राहकांकडे मूळ थकबाकी २ कोटी ६२ लाख रुपये आहे. त्यावरील व्याजाची रक्कम ३ कोटी ८२ लाख रुपये आहे. ३ लाख विलंब शुल्कापोटी थकले आहेत.

5157 - वीजग्राहक
6.45 कोटी - थकबाकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com