समाधिस्थळाला विकासाची प्रतीक्षा

समाधिस्थळाला विकासाची प्रतीक्षा

कळमेश्‍वर तालुक्‍यातील श्रीक्षेत्र धापेवाड्याचा नावलौकिक ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात आहे. चंद्राकार वाहणाऱ्या चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले धापेवाडा पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूरप्रमाणेच येथेही लाडका विठ्ठल भक्‍तांना स्वयंभू दर्शन देतो. ज्याप्रमाणे पुंडलिकाच्या भक्‍तीने प्रसन्न होऊन विठ्ठल पंढरपुरात अवतरले त्याचप्रमाणे कोलबास्वामींची भक्ती पाहून ते धापेवाड्यातही आले. 

कोलबास्वामींचा जन्म नागपूर जिल्ह्यातील बेला या गावी ज्येष्ठ शुद्ध सप्तमी, सोमवार रोजी  १६५७ साली झाला. वयाची १०५ वर्षे पूर्ण केल्यानंतर जन्मतिथी, वार, त्याच दिवशी सन १७६२ साली धापेवाड्यात ते समाधिस्त झाले. बेल्याहून धापेवाड्यात आल्यानंतर स्वामी चंद्रभागेच्या तीरावर झोपडी टाकून राहू लागले. विणकराचे काम करून त्यातून जे काही मिळेल त्यावर प्रपंच करून परमार्थ करावा. ईश्‍वर चिंतन करावे, असा त्यांचा नित्यक्रम होता. इथेच वास्तव्य करणाऱ्या शिवस्वरूप श्री पूज्य धर्मशेटीबाबा रंगारी यांना त्यांनी गुरू केले. धर्मशेट्टीबाबा मराठीचे आद्यकवी, काशीच्या मुकुंदराज महाराजांचे गुरू हरिनाथच होय, असे जाणकार सांगतात. संत मकरंदपुरी महाराज, औलिया आखुंडसीबाबा, हरिदास महाराज, रघुसंत महाराज, ब्रह्मचारी महाराज, आनंदीबुवा, पंकाजी बुवा, ढेबूजी बुवा, दत्तभक्त झेंडेवाले महाराज, जमवागिरी महाराज, स्त्री संत वाराबाई, गुरू यादवराव महाराज आदी संतांच्या वास्तव्याने श्रीक्षेत्र धापेवाडा पावन झाले. 

कोलबास्वामींनी आपल्या आयुष्यात पंढरपूरच्या अनेक वाऱ्या केल्या. कालांतराने वृद्धपणामुळे ते पंढरपूरला जाऊ शकत नव्हते. तेव्हा विठ्ठलाने कोलबास्वामींच्या स्वप्नात येऊन चंद्रभागा नदीच्या किनारी उत्तर दिशेला असलेल्या बाहुली विहिरीत दर्शन देऊ, असे संकेत दिले. बाहुली विहिरीत त्यांना विठ्ठल-रुक्‍मिणीच्या मूर्तीचे दर्शन झाले. त्यांनी मूर्ती विहिरीतून काढून  त्यांची मंदिरात स्थापना केली. मूर्ती स्थापनेचा दिवस बुधवार ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके १९६२ इ. स. १७४१ होता.

कोलबास्वामींसह इतरही ५ ते ७ संतांच्या समाधिस्थळी आषाढी पौर्णिमा व वसंत पंचमी या दिवशी यात्रा भरते. वर्षभर भाविकांची वर्दळ असूनही, मठ परिसरात यात्रेदरम्यान केवळ ५०० भक्तांच्या निवासाची सोय होऊ शकते. जी अपुरी आहे. स्वामींचे समाधिस्थळ दुर्लक्षित आहे.  १९८० पासून स्वामींच्या मठाचा कार्यभार सांभाळणारे व १९९० साली गादी प्राप्त केल्यानंतर कार्यरत असलेले मठाधिपती श्रीहरी महाराज वेळेकर यांनी भक्त निवासाबद्दल खंत व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विदर्भ पंढरीवर लक्ष केंद्रित केले तर या भागाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्‍वास भक्‍तांकडून व्यक्‍त केला जातो. सध्या मंदिरात सुरू असलेल्या स्मरणोत्सव सोहळ्यास प्रशांत महाराज धर्मापुरीकर, श्रीहरी महाराज निनावे, लक्ष्मण महाराज तराळ, अरुण महाराज येलेकर, सोपान महाराज काळपांडे, लक्ष्मण महाराज गुडवार आदींचा समावेश आहे. कळमेश्‍वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com