नागपूर - पिण्याच्या पाण्याच्या बचतीबाबत महापालिका गंभीर असून, गरज पडल्यास पाण्याचे रेशनिंग करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्त अश्विन मुद्गल यांनी स्पष्ट केले. पाण्याची गळती, चोरी एवढेच नव्हे, तर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापरही करण्यात येत असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.
शहरात नागरिकांकडून होणारी पाण्याची उधळपट्टी, त्यावर जलतज्ज्ञांची चर्चा घेऊन "सकाळ'ने नागपूरकर करतात गरजेपेक्षा दुप्पट पाण्याची उधळपट्टी असे वृत्त प्रकाशित केले. शहराला असलेली पाण्याची गरज आणि शहराला मिळत असलेले मुबलक पाणी, त्यामुळे उधळपट्टी होत असल्याकडे महापालिकेचे लक्ष वेधत जलतज्ज्ञांनी पाण्याचे रेशनिंग करण्याचा सल्ला दिला होता. यावर मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांनी उधळपट्टी होत असल्याचा इन्कार केला. ते म्हणाले, 'शहरात अद्यापही गळती, पाणी चोरी, हिशेब नसलेले पाणी यांसारखे प्रकार आहे. त्यामुळे निश्चितच हे प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. हिशेब नसलेल्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात येत आहे. गळतीसारख्या प्रकारांवरही नियंत्रण आणण्यात येत आहे.''
|