नागपूर - मध्य भारतात गेल्या वर्षभरात विजेच्या धक्क्यामुळे दहा वाघ आणि तीन बिबट्यांना जीव गमवावा लागला. गेल्या 22 ऑक्टोबर 2016 ते 14 ऑक्टोबर 2017 या काळात सहा वाघ महाराष्ट्रात, तर चार वाघ मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडले. तीन बिबटे मध्य प्रदेशात मृत्युमुखी पडले.
विदर्भातील मध्य चांदामधील धानापूर परिसरात 4 नोव्हेंबर 2016 रोजी एक वाघ विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडला. या वर्षांच्या सुरवातीला पेंच व्याघ्र प्रकल्पातील सालेघाटजवळ एक वाघीण मृत्युमुखी पडली.
वन्यजीवांच्या शिकारीसाठी आतापर्यंत शिकारीच वीजप्रवाहाचा वापर करत होते; पण आता याच वन्यजीवांपासून शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वीजप्रवाहाचा वापर करावा लागत आहे. यात वन्यप्राण्यांना मारणे हा त्यांचा हेतू नाही; मात्र तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर असलेले वाघ, बिबट्या वीजप्रवाहाचे बळी ठरतात. जंगलाला लागून असलेल्या प्रामुख्याने वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतांमध्ये अशा घटना नेहमी घडतात.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यालगतच्या शेतातील कुंपणावर वीजप्रवाह सोडलेल्या तारांचे कुंपण मोठे आहे.
|