नागपूर - गणवेशाप्रमाणेच पुस्तकांचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय आधी शिक्षण विभागाने घेतला होता. शिक्षण विभागाने यात बदल करीत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट पुस्तके वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.
सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. यासाठी बालभारतीकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पुस्तकांचा पुरवठा केला जातो. यावर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या एकूण 3 लाख 74 हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी बालभारतीकडे नोंदविली आहे. यात जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय खासगी विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत मिळणारा निधी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वळता करण्याचा निर्णय आधी शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, यात येणारी अडचण व विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळावीत, यासाठी जुन्याच पद्धतीने पुस्तकांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. यासाठी बालभारतीच्या संकेतस्थळाला भेट जिल्हा परिषदेने 3 लाख 74 हजार विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी नोंदविली आहे.
असे होणार पुस्तकाचे वितरण
शाळा सुरू झाल्यानंतर महिना ते दीड महिना विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत नाही. मात्र, असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी शिक्षण विभागाने मे महिनाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व शाळांना पुस्तके पोचविण्याचे नियोजन केले आहे. जिल्हास्तरावरून ब्लॉकस्तरावर पुस्तके पाठविली जातील. त्या ठिकाणाहून शाळांना त्याची उचल करावी लागेल.
इयत्तानिहाय विद्यार्थ्यांची संख्या
सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. त्यात इयत्ता पहिली ते दुसरीच्या 76 हजार 462, तिसरी ते पाचवीच्या 1 लाख 34 हजार 16, सहावी ते आठवीच्या 1 लाख 64 हजार अशा एकूण 3 लाख 74 हजार 481 विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.
|