अमरावती - भातकुली तालुक्यातील गणोजादेवी येथे विहिरीतून गाळ काढण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला; तर दोघे अत्यवस्थ आहेत. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. अत्यवस्थ दोघांवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ओंकार अवधूत वानखडे (वय 42) आणि अविनाश दिगंबर बिजवे (वय 35; दोघेही रा. गणोजादेवी) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. दीनानाथ विठ्ठल बिजवे (वय 30) व राजू मारोतराव खेडकर (वय 35; रा. गणोजादेवी) हे दोघे अत्यवस्थ आहेत.
गणोजादेवी या गावातील विनायक बिजवे यांच्या घरातील विहिरीतून गाळ काढण्याचे काम सकाळी दहापासून सुरू होते. त्या कामाला चार मजूर लावण्यात आले होते. दुपारी दीडपर्यंत गाळ काढून झाला; मात्र त्यानंतरही आत असलेली मोटार लावूनही पाणी येत नव्हते. त्यामुळे पुन्हा चौघे विहिरीत उतरले. मोटार सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्यातून धूर निघू लागला. विनायक बिजवे यांच्या घराच्या आवारातील ही विहीर अरुंद असून चाळीस फूट खोल आहे. मोटारपंपाचा धूर जास्त प्रमाणात साचल्यामुळे आत काम करणाऱ्या चौघांची प्रकृती बिघडली.
वर असलेल्या लोकांनी या चौघांना दोराने बांधून विहिरीबाहेर काढले. त्यांना प्रथम भातकुली येथील एका खासगी रुगणालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच ओंकार वानखडे व अविनाश बिजवे या दोन मजुरांचा मृत्यू झाल्याचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांनी सांगितले.
|