सरासरीपेक्षा अधिक पाऊस; तरीही जलसाठा चिंताजनक

File photo
File photo

अमरावती ः पश्‍चिम विदर्भातील एका मोठ्या धरणासह तीन मध्यम प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत; तर दोन मोठ्या व अकरा मध्यम प्रकल्पांत 10 दलघमी एवढाही जलसाठा होऊ शकलेला नाही. विभागात आतापर्यंत सरासरीच्या 125 टक्के पाऊस झाला; मात्र पाणलोट क्षेत्रात दमदार सरी न बरसल्याने ही धरणे तहानलेलीच आहेत.
पश्‍चिम विदर्भात 9 मोठी, 23 मध्यम आणि 452 लघू प्रकल्प आहेत. 1 जून ते 14 जुलै यादरम्यान झालेल्या पावसाने धरणांच्या जलपातळीत वाढ होऊन एकूण 3,221 च्या तुलनेत 1,031 दलघमी (32 टक्के) जलसाठा झाला. अमरावती जिल्ह्यातील अप्परवर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 195 मिलिमीटर पाऊस झाला व धरणातील जलसाठा 223 दलघमींवर पोचला. सरासरीने तो 39 टक्के असून अजूनही धरणाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यवतमाळमधील पूस धरणक्षेत्रात 492; अरुणावती क्षेत्रात 431; आणि बेंबळा प्रकल्प क्षेत्रात 356 मिलिमीटर पाऊस झाला. अकोल्यातील काटेपूर्णा 306 आणि नळगंगा क्षेत्रात 208 मिलिमीटर पाऊस झाला. या सर्वच धरणांच्या जलपातळीत वाढ झालेली असली, तरी ती फारशी समाधानकारक नाही.
विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा व पेनटाकळी या दोन्ही मोठ्या धरणांत 10 दलघमीही साठा होऊ शकलेला नाही. बेंबळा कोरडेच आहे. नळगंगामध्ये 7.17 आणि पेनटाकळीत 1.62 दलघमी साठा आतापर्यंत होऊ शकला. मध्यम प्रकल्पांच्या शृंखलेतील अकोल्यातील घुंगशी बॅरेज व बुलडाण्यातील मस, कोराडी ही धरणे कोरडीच आहेत. तर, यवतमाळमधील गोकी, अकोल्यातील निर्गुणा, मोर्णा, उमा; वाशीममधील सोनल व एकबुर्जी; बुलडाण्यातील ज्ञानगंगा, पलढग, मन, तोरणा व उतावळी धरणात 10 दलघमी एवढाही साठा अद्याप झालेला नाही.
शून्य साठा असलेली धरणे
खडकपूर्णा (बुलडाणा), घुंगशी बॅरेज (अकोला), मस व कोराडी (बुलडाणा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com