वाण बदल, व्यवस्थापनातून गव्हाचे दर्जेदार उत्पादन

Sunil Rathi
Sunil Rathi

निफाड तालुक्यातील (जि. नाशिक) प्रयोगशील व अभ्यासू शेतकरी गव्हाची उत्पादकता व गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी उत्कृष्ट व्यवस्थापनाची जोड त्यांनी दिली आहे. कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्राचेही मार्गदर्शन त्यांना मिळत आहे. त्याद्वारेच फुले समाधान वाणाचा सर्वत्र विस्तार झाला आहे.  

गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसर तर या पिकासाठी विशेष प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात गव्हाखाली सुमारे ६२ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र आहे. निफाड, दिंडोरी, सिन्नर, नाशिक व चांदवड तालुक्यांतील प्रयोगशील शेतकऱ्यांनी गव्हाची एकरी उत्पादकताही वाढवली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कुंदेवाडी (ता. निफाड) येथे गहू संशोधन केंद्रही कार्यरत आहे. बदलते हवामान, सिंचन सुविधा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आदी विविध कारणे लक्षात घेता केंद्राने विविध जाती विकसित केल्या आहेत. पैकी केंद्राच्या फुले समाधान या वाणाचा चांगला प्रसार झाला आहे. गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे वाफसा वेळेवर होत नसल्याने पेरण्या लांबणीवर जायच्या. विशेष करून शेतकरी निफाड तालुक्यात ऊसतोडणीनंतर तसेच खरीप पिकांच्या काढणीनंतर पेरण्या करतात. या अनुषंगाने गव्हाच्या ‘फुले समाधान’ वाणाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 

सेंद्रिय पद्धतीने पोसलेला गहू 
चांदोरी (ता. निफाड) येथील शरद सावंत हवामान बदलास अनुकूलता, अधिक उत्पादकता, तांबेरा प्रतिरोधक व चव या मुख्य बाजू पडताळून गहू वाणाची निवड करतात. त्यांचा स्वतःचा व वाट्याने केला जाणारा असा मिळून चार एकर गहू असतो. तीन वर्षांपासून ‘फुले समाधान’ या वाणाची पेरणी ते करतात. अतिथंडीत अन्य वाणांच्या ओंब्या पिवळ्या पडतात. तापमानात वाढीतही या वाणावर परिणाम होत नाही, असा त्यांचा अनुभव आहे. शास्त्रीय पद्धतीचे पेरणी नियोजन, सेंद्रिय व्यवस्थापन व खर्चात बचत करून उत्पादन वाढ करण्यात त्यांना यश आले आहे. पेरणी करून पाणी दिल्याने एकसारखा ओलावा तयार होऊन पेरणीपश्‍चात उतारा व फुटव्यांचे प्रमाण एकसारखे मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सावंत यांच्या व्यवस्थापनातील बाबी 

  • पेरणीपूर्वी खोलगट नांगरट तसेच सेंद्रिय खतावर जिवाणू खते पसरवून खते एकत्र केली जातात. 
  • त्यांच्या वापरानंतर पुढील १२ तासांत पेरणी. १४ ते १६ तासांत तातडीने पाणी देतात.
  • एकरी ४० किलो बियाण्यांचा वापर
  • पेरणीनंतर २१ व्या दिवसानंतर आंबवणी फुटवा अवस्थेत तर पुढील पाणी ३६ व्या दिवशी वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन दिले जाते. 
  • तर ५६ व्या दिवसानंतर वाढीच्या अवस्थेत पाणी देताना स्फुरद व पालाश विरघळवणारी जिवाणूखते प्रवाही पद्धतीने पाण्यातून. एकरी एक किलो प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून सलाइनद्वारे पाण्यात सोडली जातात.
  • पाच एचपी पंपाला एक एकर भरणा करण्यासाठी आठ तास लागतात. त्यानुसार प्रति तास २५ लिटर द्रावण सोडण्याचे नियोजन
  • तण दिसून येताच निंदणी व गरजेनुसार तणनाशक फवारणी. 
  • दर दोन ते तीन वर्षांनी कंपोस्ट खताचा वापर- एकरी २० बैलगाड्या  

सेंद्रिय गव्हाला मोठी मागणी 
बियाणे, पेरणी, मजुरी, जैविक व सेंद्रिय खते, अन्य आनुषंगिक असा मिळून एकरी १५ हजार ते काही वेळा २० हजार रुपये खर्च येतो. एकरी १८ ते २२ क्विंटल दरम्यान दरवर्षी उत्पादन मिळते. काढणीपश्‍चात गहू वाळवून निसून घेतला जातो. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यावर भर असल्याने ग्राहकांकडून मोठी मागणी येते. सावंत यांनी दहा वर्षांपासून ग्राहक जोडले असून, त्यांना थेट विक्री होते. शाळेतील शिक्षकांकडूनही मागणी असते. दाण्यांना चकाकी व एकसारखी प्रतवारी यामुळे २३०० ते २५०० दरम्यान प्रति क्विंटल दर मिळतो. थेट विक्रीमुळे नफ्यात वाढ होते.  

एकरी २२ क्विंटलपर्यंत उत्पादन
काढणी हार्वेस्टरने होते. त्यानंतर शेतात पडलेले गव्हाच्या काडाचा रोटाव्हेटरच्या साह्याने बारीक भुगा केला जातो. त्यावर ‘वेस्ट डी कंपोजर’चे द्रावण फवारणी करून हे घटक मातीआड केले जाते. त्यांचा खत म्हणून पुढील पिकासाठी वापर होतो. खरिपात सोयाबीन घेतले जाते. त्याच्या काडाचाही असाच वापर केला जातो. त्यामुळे नत्र, स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची उपलब्धता चांगल्या प्रकारे होते. एकरी १५ हजार रुपयांपर्यंत उत्पादन खर्च होतो. एकरी २० ते २२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. सेंद्रिय, दर्जेदार पद्धतीचा गहू असल्याने थेट बांधावरून ५० टक्के तर उर्वरित स्थानिक बाजारात विक्री होते. दर क्विंटलला २२०० ते २५०० रुपये मिळतो. टपोरे व आकर्षक दाणे, चपातीची प्रत उत्कृष्ट व उत्पादकता या कसोटीवर फुले समाधान हा वाण चांगला ठरल्याचे राठी सांगतात.  

शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या प्रमुख बाबी 

  • वेळेवर पेरणीसाठी १०० किलो, तर उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाण्याचा वापर
  • प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर व २५० ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया
  • पेरणी करतेवेळी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश (६०:६०:४०) मात्रा
  • ५ ते ६ से.मी खोल व २० सेंमी अंतराने एकेरी पद्धतीने पेरणीवर भर
  • जमिनीचा उतार लक्षात घेऊन घेऊन प्रवाही पद्धतीने सिंचन 
  • जमिनीच्या प्रतवारीनुसार एकूण ५ ते ६  पाणी. संवेदनशील अवस्थांमध्ये पाण्याची गरज अधिक.   

पाण्याची पाळी    दिवसानंतर पिकाची अवस्था
१८ ते २१              मुकुटमुळे फुटण्याची अवस्था  
४० ते ४५             कांडी धरण्याची अवस्था  
६० ते ६५             फुलोरा व चीक भरण्याची अवस्था  
८० ते ८५              दाणे भरण्याची अवस्था
(हलकी जमीन असल्यास शेतकरी एक पाणी वाढीव देतात.)

शेतकऱ्यांची प्रमुख निरीक्षणे 

  • शिफारशीनुसार मात्रेत खते दिल्याने खर्चात बचत
  • पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्याने एकसारखा उतारा. फुटव्याच्या अवस्थेत माव्याचा प्रादुर्भाव कमी.
  • तांबेरा रोगास प्रतिकारक्षम वाणाचा वापर केल्यास पीक संरक्षण खर्च तुलनेने कमी

भुश्‍शातून अतिरिक्त नफा
काही शेतकरी गव्हाच्या उपलब्ध भुश्‍शाचीही विक्री करतात. परिसरात दुग्ध व्यवसाय वाढत असल्याने तेथून तसेच वीटभट्टी, मशरूम उत्पादनासाठी त्यास मागणी आहे. अनेक शेतकरी द्राक्ष बागेत मल्चिंगसाठी त्याचा वापर करतात.

राठी यांचा सेंद्रिय दर्जेदार गहू 
निफाड (जि. नाशिक) येथील प्रयोगशील शेतकरी सुनील राठी ३० वर्षांपासून शेती करतात. गहू, सोयाबीन व ऊस ही त्यांची प्रमुख पिके आहेत. चार वर्षांपासून दरवर्षी पाच एकरांवर फुले समाधान गहू ते घेत आहेत. शेतीत रासायनिक निविष्ठांचा वापर ते अजिबात करीत नाहीत. पेरणी करून पाणी दिल्यानंतर पहिली आंबवणी २१ दिवसांनी केली जाते. पुढील चार पाणी २१ दिवसांनी देण्यात येतात. अनेक वर्षांपासून गांडूळ खत, शेणखतावर पोसलेली ही जमीन सुपीक झाली आहे. पाणी व्यवस्थापन हा देखील त्यांच्या व्यवस्थापनाचा मुख्य भाग आहे. 

फुले समाधान वाणाची वैशिष्ट्ये  

  • एनआयएडब्ल्यू १९९४)(सरबती वाण)
  • २०१४ मध्ये प्रसारण
  • बागायत पेरणीची १ ते ३१ नोव्हेंबर, तर उशिरा १५ डिसेंबरपर्यंत पेरणी शिफारस
  • तांबेरा रोगास प्रतिकारक
  • दाण्यांमध्ये प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त 
  • चपातीसाठी उत्तम
  • पक्व होण्याचा कालावधी बागायतीत वेळेवर ११५ दिवस व बागायतीत उशिरा पेरणीखाली ११० दिवस
  • उत्पादकता (क्विंटल प्रति हेक्टर) बागायतीत वेळेवर ४५ ते ५० क्विं. तर बागायतीत उशिरा पेरणीखाली- ४२ ते  ४५ क्विं. 

शास्त्रज्ञ- शेतकरी समन्वय 
कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात अखिल भारतीय कृषी समन्वय प्रकल्पांतर्गत गहू पिकावर संशोधन सुरू असते. त्यामध्ये तांबेरा रोगप्रतिकारक, उच्च उत्पादन व हवामान बदलात तग धरणारा वाण म्हणून २०१४ मध्ये ‘फुले समाधान’ वाणाचा राज्यभर प्रसार झाला. केंद्राने माफक दराने बियाणे उपलब्ध करून देण्यासह दर तीन वर्षांनी बियाणे बदलाची शिफारस केली आहे. शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शनही करतात. यात गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके. पैदासकार डॉ. उदय काचोळे, कृषी विद्यावेत्ता डॉ. संजयकुमार वाडीले, मृद्‍शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ डॉ. बबनराव इल्हे, डॉ. भानुदास गमे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र म्हस्के यांचा समावेश असतो.  

शरद सावंत  ९७६६८६४९७४
सुनील राठी  ९८९००५५५६७
डॉ. सुरेश दोडके  ९६०४२६११०१
(गहू विशेषज्ञ)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com