बारमाही भाजीपाला  शेतीतून आर्थिक बळकटी

anilpatil
anilpatil

मेहू (जि.जळगाव) येथील अनिल अर्जून पाटील यांनी २१ एकर शेतीत कापूस हे मुख्य पीक ठेवले. मात्र जोडीला बाजारपेठ व हंगाम यांचा विचार करून ढोबळी व साधी मिरची, भेंडी, कलिंगड अशी व्यावसायिक पिकांची वर्षभराची पीकपद्धती ठेवून शेतीचे अर्थकारण उंचावले आहे.  

मेहू (ता.पारोळा, जि.जळगाव) परिसरात हलकी, मध्यम स्वरूपाची जमीन आहे. गावाजवळ छोटी नदी आहे. याच नदीकाठी अनिल अर्जून पाटील यांची २१ एकर शेती आहे. नदीत साठवण बंधारे तयार केले आहेत. यामुळे शिवारात कृत्रिम जलसाठ्यांना मुबलक पाणी आहे. दोन विहिरी व एक कूपनलिका आहे. साहजिकच संपूर्ण शेतीतून बारमाही पिकांचे उत्पादन घेतले जाते. पूर्वी पाटील यांच्याकडे कापूस व अन्य पारंपरिक  पिके असायची. आठ ते १० वर्षांत त्यांनी पीक पद्धतीत बदल केला. १० ते १२ एकरांत कापसाची लागवड असते. या पिकात विदर्भात लोकप्रिय असलेला ‘अमृत पॅटर्न’ यंदा राबविला आहे. यात बीटी वाणांची लागवड सात बाय एक फूट अंतरावर केली आहे. दोन ओळींआड पाच फुटाची सरी आहे. पीक जोमात असून, चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. हंगामी पीक म्हणून ते कायम ठेवताना चार एकरांत लिंबू, अन्य क्षेत्रात साधी व ढोबळी मिरची, भेंडी, वांगी ही पिके असतात. दोन ट्रॅक्टर्स आहेत. त्यात एक मिनी ट्रॅक्टर असून कापूस व अन्य पिकांत त्याद्वारे आंतरमशागत होते. एक बैलजोडी, तीन सालगडी आहेत.

उत्पादन व व उत्पन्न 
हंगामात दररोज दीड क्विंटल भेंडी काढणीस येते. किलोला १८ ते ४० रुपयांपर्यंत दर मिळतो. कलिंगडाचे एकरी २५ टनांपर्यंत उत्पादन येते. खरबुजाचे दोन एकरांत २५ टन उत्पादन मिळाले आहे. कलिंगडाचे सुमारे ७० ते ८० दिवसांत दीड लाख रुपये उत्पन्न मिळते. ढोबळी मिरचीचे एकूण क्षेत्रात १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. 

व्यावसायिक पिकांची लागवड 
तीन वर्षांपासून दीड ते दोन एकरात एप्रिलमध्ये भेंडीची लागवड होते. या काळात लागवड केलेल्या भेंडीला जून-जुलैमध्ये चांगले दर मिळतात. त्या काळात या पिकाची आवकही कमी असते. पावसाळ्यात तणनियंत्रणाची समस्या असते. भेंडीमुळे अंग खाजण्याचे प्रकार वाढतात, यामुळे मजूर या पिकात तणनियंत्रणासाठी तयार नसतात.  मजूरटंचाईदेखील असते. तणनियंत्रण तीन ते चार वेळेस करावे लागते. त्यात १२ ते १३ हजार रुपये एकूण खर्च येतो. ही समस्या लक्षात घेता पॉली मल्चिंगवर लागवड सुरू केली आहे. विद्राव्य खते ठिबकद्वारे संतुलित प्रमाणात देतात. आंतरमशागतीसाठी पॉवर टिलर आहे. 

दरवर्षी साध्या मिरचीची दीड ते दोन एकरांत मे, जून महिन्यात लागवड होते. मिरचीची काढणी अन्य  शेतकऱ्यांच्या तुलनेत लवकर सुरू होते. त्यामुळे सुरुवातीच्या अधिक दरांचा लाभ घेता येतो. 

या मिरचीसोबत दोन वर्षांपासून २० गुंठे शेडनेटमध्ये ढोबळी मिरची घेतली जात आहे. 
  जूनमध्ये लागवड केली जाते तर ५५ ते ६० दिवसांत काढणी सुरू होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मिरची, भेंडीचे पीक हिवाळ्याच्या मध्यापर्यंत असते. त्यानंतर हे क्षेत्र रिकामे केले जाते. तसेच कापसाखील काही क्षेत्र रिकामे करून त्यात चार ते पाच एकरात कलिंगड लागवड केली जाते. यंदा फेब्रुवारीत दोन एकरांत खरबुजाची लागवड केली होती. जळगाव जिल्ह्यात उष्णता अधिक असते. त्यापासून खरबुजाचा बचाव करण्यासाठी ‘क्रॉप कव्हर’चा उपयोग केला. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू होते. बाजार समिती बंद होती. अशा स्थितीत दररोज ९०० किलो ते एक क्विंटल खरबुजाची थेट विक्री तीन किलोमीटरवर असलेल्या पारोळा शहरात केली. सायंकाळपर्यंत सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळवले. 

कागदी लिंबाच्या बागेचे पाच वर्षांपासून संगोपन केले जात आहे. उन्हाळ्यात या लिंबाना किलोला ४० ते ५० रुपये दर असतात. अन्य वेळी हेच दर १० ते १५ रूपयांपर्यंतही खाली येतात. बागेला खते, तणनियंत्रण वा एकूण देखभाल तुलनेने कमी असते. वर्षातून एकवेळ शेणखत देण्यात येते. सर्व पिकांसाठी ठिबकचा उपयोग केला जातो. 

ताज्या भाजीपाल्याला मागणी
पारोळा येथील बाजार समितीत भाज्या, फळांची विक्री होते. तेथे ताजा माल पोचावा यासाठी काढणी नेहमी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान केली जाते. साहजिकच व्यापाऱ्यांकडून त्याला चांगले दर मिळतात.भाजीपाला वाहतुकीसाठी दुचाकी आहे. त्यावर मजबूत यंत्रणा बसविली आहे. त्याद्वारे दोन क्विंटल भाजीपाला वाहून नेणे शक्य होते. यामुळे मालवाहू वाहनाची शोधाशोध, भाडेशुल्क यांची कटकट राहत नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com