कलिंगड, भातशेतीसोबत  ब्रॉयलर पक्षांची करार शेती 

deepak-gawde
deepak-gawde

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक विष्णू गावडे मुंबईत राहायचे. काही वर्षांपूर्वी गावी परतून त्यांनी घरच्या शेतीत लक्ष घातले. आठ एकर कलिंगड व भाजीपाला शेतीला पाचहजार ब्रॉयलर पक्षांची करार शेती सुरू केली. खाद्यकारखाना उभारला. आज शेतीसह पूरक व्यवसायाला चालना देत आर्थिक व सामाजिक प्रगती साधली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील पेंडूर-कनकवाडी  गाव कलिंगड पिकासाठी ओळखले जाते. गावातील अधिकाधिक तरुण हे पीक घेतात. गावकऱ्यांनी तयार केलेली पाण्याची उपलब्धता, प्रचंड मेहनत आणि एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती त्यातून गावाने ओळख तयार केली आहे.

गावडे यांची सुधारीत शेती 
पेंडुर-मोगरणे मार्गावर दीपक गावडे यांचे घर आहे. काही वर्षे त्यांनी मुंबईत रिक्षा चालवली. परंतु आर्थिक कमाई तेवढी नव्हती. मनही रमेना. अखेर २००० मध्ये गावी परतून आपल्या सहा ते सात एकर शेतीत लक्ष घातले. भात, उडीद, मूग अशी पिके घेऊ लागले. पण नफ्याचा मेळ लागत नव्हता. बाजारपेठेतील मागणी व अर्थकारणाचा अभ्यास केल्यानंतर कलिंगड पिकाचा पर्याय मिळाला. दोन एकरांत लागवड केली. हळूहळू हे पीक फायदेशीर असल्याचे उमगले. क्षेत्रात वाढ केली. 

शेतीत प्रगती 
आजमितीला ऑक्टोबर ते एप्रिल या काळात टप्प्याटप्प्याने एकूण आठ एकरांत कलिंगडाची लागवड 
या पिकात तयार केला हातखंडा
ठिबक सिंचन, मल्चिंग व एकूण व्यवस्थापनातून फळांच्या गुणवत्तेकडे लक्ष देताना एकरी २० टनांपर्यंत उत्पादन
किलोला ९ ते १० रुपये दर. हंगामानुसार ८० ते ९० दिवसांच्या काळात हे पीक दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देते. गोव्यातील व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. 

कुटुंबाचा मोठा सहभाग
आठ एकर कलिंगड, भातशेती, पाचहजार पक्षांचे संगोपन, भाजीपाला लागवड या सर्व पसाऱ्यात गावडे यांना कुटुंबाचे मोठे पाठबळ मिळते. कुकूटपालनात मुलगा रोहित चांगलाच रमला आहे. या व्यवसायाचे प्रशिक्षणही त्याने देखील आहे. पिल्लांना खाद्य, पाणी देणे, साफसफाई करणे ही कामे कुटुंबातील सदस्यच करतात त्यामुळे मजुरीवरील खर्च कमी झाला आहे. 

शेतीतील उत्पन्नातून उभारले घर
शेतीतील कमाईतूनच चांगले भांडवल उभारून व कर्ज न घेता घर उभारू शकलो असे गावडे अभिमानाने सांगतात. त्यांच्या मुलाने बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रम तर मुलीने उच्चशिक्षण घेतले आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च शेतीतील उत्पन्नातूनच झाला आहे. येत्या काळात हॅचरी सुरू करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. 

व्यावसायिक पोल्ट्री व्यवसाय  
कलिंगडातून चार पैसे हाती शिल्लक राहात असल्याने जोड म्हणून पोल्ट्री व्यवसायाचा पर्याय निवडला. सन २०१३ ते २०१६ पर्यत गावरान कुकूटपालन केले. देखभालीत कुठेही कमी पडले नाहीत. परंतु म्हणावी तशी मागणी नव्हती. विक्री करताना तीन वर्षे तारेवरची कसरत सुरू होती. अशात नामी संधी चालून आली. गावडे कुकूटपालनासाठी पेंडुर पंचक्रोशीत माहीत झाले होते. त्यातूनच कोकणातील व्यावसायिकाकडून ब्रॉयलर पक्षांच्या करार शेतीचा प्रस्ताव आला. यात पिल्ले, लागणारे खाद्य, औषधे व मार्गदर्शनपर सेवाही मिळणार होती. शेड, साहित्य गावडे यांच्याकडे उपलब्ध होतेच. दोन हजार पिल्लांपासून सुरू झालेल्या व्यवसायात आता चार वर्षांपासून सातत्य आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ठळक बाबी  
सध्या पाच हजार पक्षी. तीनहजार व दोनहजार पक्षी अशा वर्षांत सुमारे सहा ते सात बॅचेस 
७० बाय ३० फूट आकाराचे सुरुवातीचे शेड.
व्यवसायात चांगला जम बसविल्यानंतर २०१८ मध्ये वाढ. साडेपाच लाख रुपये खर्चून १०० बाय २८ फूट आकाराचे शेड उभारले. (क्षमता तीन हजार पक्षांची) 

पशुखाद्य कारखाना
पक्षांसाठी बाहेरून खाद्य घेतल्यास महाग पडते. परिसरातही काही पोल्ट्री व्यावसायिक आहेत. हा विचार करून आपल्यासह या  शेतकऱ्यांसाठी गावडे यांनी दोन सहकाऱ्यांसोबत भागीदारीतून घरानजीकच पशुखाद्य कारखाना उभारला. त्यातून प्रति तास ५०० किलो खाद्यनिर्मीती होते. त्यातून बाहेरील खाद्यावरील प्रति किलो दोन रुपये खर्च कमी झाल्याचे गावडे सांगतात. 

भाजीपाला शेतीची जोड 
कलिंगड व पोल्ट्रीला सुमारे ३० गुंठ्यात दोडका, कारली, वाल, काकडी अशी वेलवर्गीय भाज्यांची जोड दिली आहे. जून ते ऑक्टोबर व नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत ही पिके घेण्यात येतात. मालवण कट्टा बाजारपेठेतील व्यापारी खरेदी करतात. विशेष म्हणजे विक्री किलोवर न होता नगावर होते. काकडीला तीन रुपये, दोडका दहा ते बारा, कारल्याला ४ ते ५ आणि वालीच्या पेंडीला ५ ते ६ रुपये दर मिळतो. सध्या दररोज काकडी ३०० नग, दोडका १५० नग, कारली २५० नग, वाल १०० पेंडी असे उत्पादन होते. 

अर्थकारण 
सुमारे ४० दिवसांत पक्षाचे वजन पावणेदोनशे किलो ते दोन किलोपर्यंत होते. त्यावेळी पक्षाला किलोला सहा रुपयांपर्यंत दर  मिळतो. तीनहजार पक्षी असल्यास प्रति बॅच ३६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. वर्षभरात सात बॅचेस झाल्यास  दोन लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. 

लॉकडाऊनची झळ
मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत पाच हजार पक्षी होते. करार असल्यामुळे संबंधित कंपनी व गावडे अशा दोघांनाही नुकसानीची झळ सोसावी लागली. याकाळात पक्षांचा दर किलोला १० रुपयांपर्यंत खाली आला होता. 

दीपक विष्णू गावडे, ७७९८७७८३१४, ८८०६४६३१०१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com