राहुरी येथील तनपुरे बंधूंच्या मुक्त गोठ्यातील गायी.
राहुरी येथील तनपुरे बंधूंच्या मुक्त गोठ्यातील गायी.

थेट विक्री, प्रक्रियेतून फायदेशीर दुग्धव्यवसायाकडे

दुग्ध व्यवसाय अत्यंत खर्चिक झाला आहे. केवळ डेअरीला दूध घालण्याएेवजी दुधाची थेट विक्री, प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे अशा मूल्यवर्धनातूनच हा व्यवसाय फायदेशीर करता येईल. हीच बाब लक्षात घेऊन राहुरी (जि. नगर) येथील तनपुरे बंधूंनी आपल्या दुग्धव्यवसायाचे स्वरूप बदलले आहे. 

नगर जिल्ह्यातील राहुरी येथील आप्पासाहेब व प्रकाश हे तनपुरे बंधू सुमारे १७ वर्षांपासून दुग्धव्यवसाय करतात. अर्थात त्यावेळचे व्यवसायाचे स्वरूप तसे पारंपरिक होते. परंतु त्याच वाटेवरून कायम वाटचाल राहिली असती तर प्रगतीचा मार्ग प्रकाशमय झाला नसता. घरच्या दुधाला जोड म्हणून सन २००० च्या दरम्यान दूधसंकलनास सुरवात केली. टप्प्याटप्प्याने हे संकलन चार हजार लिटर प्रतिदिन या संख्येवर पोचले. 

दुग्धव्यवसायाचा विस्तार 
टप्प्याटप्प्याने बदलत्या काळाची गरज लक्षात घेत व्यवसायाचा विस्तार सुरू केला. सन २००७ मध्ये काही संकरीत गायी खरेदी केल्या. त्यांची गोठ्यात पैदास सुरू केली. पुढे दुधाचे प्रमाण वाढले. आज इतक्या वर्षात सातत्य, कष्ट, व्यवस्थापन कौशल्य यांच्या जोरावर व्यवसाय एका स्थिर टप्प्यावर आणल्यानंतर चार महिन्यांपूर्वी तनपुरे बंधू प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीत उतरले आहेत. प्रकाश पूर्णवेळ दुग्धव्यवसाय व शेती पाहतात. तर आप्पासाहेब नगर परिषदेत कार्यरत आहेत. 

दुग्धव्यवसाय दृष्टिक्षेपात
    जनावरे- म्हशी- ९, होल्स्टिन फ्रिजीयन- सुमारे ५५ ते ६० 
    सुमारे चार गायी साहिवाल तर लालकंधारी देखील आहे. 
    दररोजचे घरचे दूध संकलन- ६०० ते ७०० लिटर, बाहेरील शेतकऱ्यांकडूनही दूध संकलन होते.
    मुक्त गोठा- यात शंभर गायी राहू शकतात. मात्र सध्या केवळ गाभण गायी त्यात ठेवल्या जातात.  (सद्यस्थितीत वीस ते बावीस) 

थेट दूध विक्री व प्रक्रिया उत्पादने
तनपुरे यांनी राहुरी येथेच नवनाथ डेअरी अॅंड स्वीट्‌स नावाने विक्री केंद्र सुरू केले आहे. तेथून ग्राहकांना  दुधाची थेट विक्री होते. गुजरातमधील एका कंपनीसही गायीचे दूध २७ रुपये प्रति लिटर प्रमाणे दिले जाते. अलीकडील काळात दुग्धव्यवसाय उत्पादन खर्चाच्या अनुषंगाने परवडेनासा झाला आहे. त्यामुळेच थेट विक्री व त्याबरोबरच आता तनपुरे यांनी प्रक्रिया उत्पादनात चार महिन्यांपूर्वीच उडी घेतली आहे.

शेणखतापासून अतिरिक्त उत्पन्न 
तनपुरे यांची सुमारे १४ एकर शेती आहे. यात पाच एकर द्राक्ष बाग असून यंदापासूनच उत्पादन मिळण्यास सुरवात होईल. पाच एकर ऊस असून चार एकर लागवड नव्याने केली जाणार आहे. जनावरांपासून जे शेणखत मिळते त्यापासून घरच्या शेतीतील गरज प्रथमतः पूर्ण केली जाते. सेंद्रीय खतांच्या वापरामुळे शेतीची सुपिकता वाढू लागली आहे. उर्वरित खताची विक्री तीन हजार रुपये प्रति ट्रेलर दराने केली जाते. महिन्यास सुमारे दहा ते बारा ट्रेलर शेण उपलब्ध होते.   

गोठा व्यवस्थापन 
    उत्तर प्रदेशातील चार भैय्यांच्या साह्याने गोठा व्यवस्थापन होते. यात गायींच्या धारा काढणे, गायींची व गोठ्याची दररोज स्वच्छता करणे, चारा घालणे आदी कामे केली जातात. पहाटे चार ते सकाळी साडेसात पर्यंत तर संध्याकाळी चार ते सहा पर्यंत कामांचा उरक सुरू असतो. 
    प्रति जनावरास त्याच्या वयानुसार खाद्य दिले जाते. यात निम्मे सकाळी व निम्मे संध्याकाळच्या वेळेस दिले जाते. 
    प्रत्येक जनावराचे रेकॉर्ड ठेवले जाते. पशुवैद्यक डॉ. बाळासाहेब बाचकर यांची गोठ्यास नियमित भेट असते. पाहणी करुन आवश्यकतेनुसार औषधे दिली जातात.  
    पाण्यासाठी सुमारे आठ हजार लिटरची टाकी आहे. त्या व्यतिरिक्त विहीर आहे. जनावरांना फिल्टरयुक्त पाणी दिले जाते.

चाऱ्याचे व्यवस्थापन  
गरज पडेल त्याप्रमाणे चारा बाजारातून विकत घेतला जातो. त्याची रोजची गरज पाचशे किलो तर एक टन ऊस अशी आहे. चाऱ्यासाठी शेतकऱ्यांसोबत करार झाला आहे. चारा गोठ्यापर्यंत पोच केला जातो. ऊस २२०० रुपये प्रति टन दराने खरेदी केला जातो. हंगामानुसार मकादेखील खरेदी केला जातो. मजुरांची समस्या असल्याने चारापिके शेतात घेतली जात नाहीत. त्याएेवजी ती बाजारातूनच खरेदी केली जातात. सोयाबीन, हरभरा, गहू यांचा भुस्सा यांचाही वापर म्हणून होतो. शेतात धान्यपिके घेतली तर घरीच गिरणीवर भरडा तयार केला जातो.

चिलींग प्लॅन्टची सुविधा 
सन २००८ मध्ये चिलींग प्लॅंटची सुविधा सुरू केली आहे. त्याची क्षमता प्रति दिन २५ हजार लिटरपर्यंतची आहे. डेअऱ्यांकडून येणाऱ्या दुधावर चिलींगची प्रक्रिया येथे केली जाते. दररोज संबंधित डेअरीचा टॅंकर येऊन दूध घेऊन जातो. 

दररोजची विक्री 
प्रक्रियायुक्त उत्पादनांसाठी दररोजचे सुमारे १०० ते १५० लिटर दूध वापरले जाते. पनीर, आम्रखंड, श्रीखंड, दही, खवा, लस्सी, घरगुती तुपातील मिठाई आदी उत्पादने तयार केली जातात. दररोज एकूण ३० ते ४० किलोपर्यंत त्याची विक्री होते. स्थानिक पेठेत प्रति लिटर गायीचे दूध ३५ रुपये तर म्हशीचे दूध ५५ रुपये दराने विकले जाते. घरगुती तूप २०११ पासून विकले जाते. त्या वेळीचा त्याचा दर तीनशे रुपये प्रति किलो होता. आता तो पाचशे रुपये झाला आहे. सप्ताहात तीन दिवस तूप तयार होते. स्थानिक मागणीनुसार   उत्पादन घेतले जाते. पदार्थ निर्मितीसाठी राजस्थानी कामगार नोकरीस ठेवले आहेत.  

- आप्पासाहेब तनपुरे, ९८५०३२५१०३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com