शेततळ्यातील पाण्यावर डाळिंब बागेचे व्यवस्थापन

शेततळ्यासह सुभाष इंगोले
शेततळ्यासह सुभाष इंगोले

गेल्या दोन, तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने घटते अाहे. याचा थेट परिणाम सिंचनावर झाला आहे. वाशीम येथील युवा शेतकरी सुभाष इंगोले यांची सुर्वे चिखली मार्गावर दहा एकर शेती अाहे. या शेतीतील विहिरीच्या पाण्यावर सिंचन व्हायचे. परंतु जसजशी पाणी पातळी खालावत गेली तशी ही विहीरसुद्धा कोरडी पडली. त्यानंतर तीन कूपनलिका खोदल्या. परंतु या पैकी एकाही कूपनलिकेला पाणी लागले नाही. परिणामी सिंचनाचा बिकट प्रश्न उभा राहिला. या परिस्थितीत शेततळ्याने मोठा अाधार दिला अाहे. दोन वर्षांपूर्वी हिमतीने सुभाष इंगोले यांनी दहा एकरांपैकी चार एकरांत डाळिंबाची लागवड केली. अाता ही झाडे २३ महिन्यांची झाली अाहेत.     

टँकर पाण्यावर जगवली बाग 
खरिपातील पिके पावसाच्या पाण्यावर येतात. परंतु डाळिंबाच्या बागेला अाठ महिने पाणी द्यावे लागते. परंतु पाऊस कमी झाल्यामुळे फळबागेला पुरेल एवढेही पाणी इंगोले यांच्याकडे नाही. गेल्या वर्षी जानेवारी ते जून असे सहा महिने एक दिवसाअाड टँकरचे पाणी विकत घेऊन ते विहिरीत सोडले.

विहिरीतील पाणी ठिबकने बागेला दिले. इंगोले यांनी २०१५-१६ मध्ये ३४ मीटर बाय ३४ मीटर बाय सव्वा पाच मीटर अाकाराचे शेततळे खोदले. हे शेततळे भरण्यासाठी पुरेसे पाणी नव्हते. या वर्षात त्यांनी येत्या काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन आत्तापासूनच नियोजन केले. त्यांनी पावसाळ्यात विहिरीत जमा झालेले पाणी टप्प्याटप्प्याने शेततळ्यात साठवले. तसेच टँकरने पाणी आणून शेततळ्यात सोडले. पाच लाख घनमीटर एवढी या शेततळ्याची क्षमता अाहे. हे पाणी डाळिंब बागेला पुरणार आहे. 

पाण्याचा प्रत्येक थेंब लाखमोलाचा 
पैसे देऊनही पाणी मिळत नाही याची जाणीव अाता शेतकऱ्यांना झाली अाहे. हाच अनुभव सुभाष इंगोले यांनीही घेतला. त्यामुळे त्यांनी चारही एकरातील डाळिंब बाग ठिबकवर जगविली. या बागेला सध्या सकाळ-संध्याकाळ अर्धा तास पाणी दिले जाते. पुढे उन्हाची तिव्रता वाढल्यानंतर पिकाच्या गरजेनुसार पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबरीने पालापाचोळ्याच्या आच्छादनावर भर दिला आहे.

नुकतेच त्यांनी २० गुंठ्यात शेडनेट उभे केले असून मार्च महिन्यात काकडी लागवडीचे नियोजन आहे. येत्या महिनाभरात २० गुंठ्यांत पॉलिहाऊस उभारून जूनमध्ये गुलाब लागवड करणार आहेत. शेततळ्यातील उपलब्ध पाण्यानुसार अागामी काळात ड्रॅगनफ्रूट, कागदी लिंबू, सीताफळ लागवडीचे नियोजन केले आहे.      

गेल्या हंगामात टँकरच्या पाण्यावर डाळिंब बाग जगविली. याही वर्षी विहिरीतील पाणी आणि टँकरने पाणी विकत आणून शेततळे भरून घेतले. डाळिंब लागवडीपासून आजपर्यंत पाण्यावरच तीन लाख रुपये खर्च झाला अाहे. यावर्षी अाधीच शेततळे भरून घेतलेले असून त्यातील पाण्यावर अाता डाळिंबाची बाग व शेडनेटमध्ये काकडीच्या पिकाचे उत्पादन मे महिन्यात सुरू होईल. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने ठिबक सिंचनानेच पाणी नियोजन केले आहे. 
- सुभाष इंगोले - ९८२२२८६४९०
- गोपाल हागे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com