दुग्ध व्यवसायातून पुढारले माळीसागज 

neelesh-gadekar
neelesh-gadekar

माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेंतर्गत दुग्ध व्यवसायास मोठी चालना मिळाली आहे. आजमितीस दुग्ध उत्पादकांची संख्या ६० पेक्षा अधिक असली तरी सुमारे ४५ शेतकऱ्यांमार्फत ६२५ लिटरपर्यंत रोजचे संकलन गावच्या डेअरीत होते. मुक्त गोठा, मूरघास तंत्राचा वापर व ‘अमूल’ दूध संघाचे मार्केट याद्वारे गावातील शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरला आहे.  

हवामान बदलाची समस्या लक्षात घेऊन कृषी विभागाने २०१४ मध्ये कोरडवाहू क्षेत्र विकास योजना सुरु केली. प्रत्येक वर्षी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील दोन गावे निवडून प्रकल्प ( २० ते ३० लाख रुपयांचा) अहवाल तयार केला जातो. कायमस्वरूपी सिंचन व्यवस्था नसलेल्या गावांची यात निवड होते. फळपीक आधारित, दुग्धोत्पादन आधारित शेती आदी पद्धती राबवल्या जातात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

योजनेला मिळाली गती
कृषी साहायक मीना पंडित यांनी माळीसागज (जि. र्औरंगाबाद, ता. वैजापूर) गावात कोरडवाहू क्षेत्र विकास योजना राबवण्यात पुढाकार घेतला. पूर्वी गावात अत्यल्प शेतकऱ्यांकडे गायी होत्या. कोरडवाहू शेतीला दुग्धव्यवसायाची जोड दिल्यास अर्थकारण बदलू शकते हे त्यांनी ओळखले. त्याप्रमाणे प्रकल्प अहवाल तयार करून अंमलबजावणीही सुरू केली. गावाचे लागवडीयोग्य क्षेत्र ५५८ हेक्टर आहे. लोकसंख्या सुमारे १९५४ असून बहुतांश शेतकरी पाच एकरपेक्षा कमी शेती असलेले आहेत.

संकरित गायींची खरेदी 
संकरित गायी (एचएफ) नगर जिल्ह्यात चांगल्या मिळतात. त्यामुळे २०१६-१७ मध्ये बहुतांश गायी  लोणी येथील बाजारातून खरेदी केल्या. योजनेंतर्गत २६ लाभार्थी होते. प्रत्येकी एक गाय याप्रमाणे गावात २६ गायी आल्या. खरेदीवेळी खरेदी समितीचे सदस्य हजर होते. प्रति गायीमागे ५० टक्के अनुदान दिले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गाडेकर झाले आर्थिक स्वयंपूर्ण 
गावातील दूध संकलनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नीलेश गाडेकर यांची दोन एकर शेती आहे. कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेंतर्गत त्यांनी गाय घेतली. आज ६ ते ७  गायी आहेत. सध्याचे संकलन ३० ते ३५ लिटर आहे. दिवाळीनंतर ते ६० लिटरपर्यंत जाईल असे ते सांगतात. त्यांनी ५० बाय ४० फूट मोकळ्या जागेत मुक्त गोठा केला आहे. मागील वर्षी बटाईच्या शेतीसह चार एकरांत २५ ते ३० टनांपर्यंत मूरघास केला. यंदा पावसात पाच ते सात टन नुकसान झाले. डेअरीमार्फत प्रत्येक दहा दिवसांनी ऑनलाइन पद्धतीने दुधाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. डेअरीमार्फत शेतकऱ्यांना खुराकाचाही पुरवठा होतो. या व्यवसायातून ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नफा होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

चाऱ्याचा प्रश्‍न सोडवला
अमोल गाडेकर व बंधू मिळून मिळून पावणेचार एकर शेती आहे. योजनेंतर्गत त्यांनी दोन संकरित गायी घेतल्या. वाटण्या होण्यापूर्वी गायींची संख्या पाच झाली. दररोज १५ लिटर दूध डेअरीला जाते. घरचा व काही विकत मका घेऊन त्यांनी २९ बॅगांमध्ये मूरघास तयार केला. गेल्या वर्षी विकतच्या चाऱ्यावर मोठा खर्च झाल्याने त्यांनी या प्रकारे चाऱ्याचा प्रश्न सोडवला. 

रोजचे सव्वासहाशे लिटर दूध संकलन 
  योजना सुरू झाली त्यावेळी गावात डेअरी नसल्याने विक्री सहा किलोमीटरवरील चोर वाघलगाव येथील डेअरीवर व्हायची. त्यावेळचे दूध संकलन ३०० लिटरपर्यंत.  
  अमूल दूध संघाने माळीसागज गावातच डेअरीची सुविधा उपलब्ध केली. 
  गाडेकर म्हणाले की सद्यःस्थितीत दररोज ६२५ लिटरपर्यंत दूध संकलन होते.
  सध्या ४५ शेतकऱ्यांकडून दूध पुरवठा. दिवाळीनंतर संकलनात मोठी वाढ अपेक्षित.  
  फॅट व एसएनएफ नुसार प्रति लिटर २०, २३ ते २५ रूपयांनुसार दर. 

योजनेमध्ये शिवाजी पवार यांनी गायी खरेदी केल्या नाहीत. मात्र अन्य शेतकऱ्यांचे सुधारित अर्थकारण पाहून त्यांनी दोन संकरित गायी स्वखर्चाने घेतल्या. आज पाच गायी असून दररोज ५० लिटर दूध डेअरीला जाते. मूरघास व मुक्त गोठा पद्धतीचा ते वापर करतात. योगेश गाडेकर यांनीही स्वखर्चातून गायी घेतल्या. सध्या सुमारे ८५ लिटर दूध डेअरीला जाते. रब्बीत मुरघासासाठी सहा एकर मका लावला आहे. कोरडवाहू क्षेत्र विकासामधून कांदाचाळ व पाइप्स घेतले. गेल्यावर्षी दुष्काळात कांदा लागवड केली नव्हती. मात्र शेतकऱ्यांकडून खरेदी करून तो चाळीत साठवला. त्याचे चांगले उत्पन्न मिळाले. 

शेणखताचे उत्पन्न
दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना शेणखत मिळत आहे. शेतीची गरज भागवून पाच हजार रुपये प्रति ट्रॉली दराने विक्री करून ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवल्याचे नीलेश गाडेकर यांनी सांगितले.

गायींच्या संख्येत वाढ 
लाभार्थी शेतकऱ्यांना होत असलेला फायदा पाहून गावातील अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. दुग्ध उत्पादक नीलेश गाडेकर यांची गावात एकमेव दूध संकलन डेअरी आहे. मीना पंडित व गाडेकर यांच्या म्हणण्यानुसार गावातील दुग्धोत्पादकांची संख्या ६० पेक्षा अधिक तर लहान- मोठ्या गायींची एकूण संख्या दोनशेहून अधिक असावी. 

मूरघास व मुक्त गोठा  
टाकळीसागज येथे पूर्वी कृषी साहायक असलेल्या भाऊसाहेब खेमनार यांचे गाव श्रीरामपूर तालुक्यात आहे. तेथील मूरघास युनिट उभारलेल्या शेतकऱ्यांच्या भेटी त्यांनी घडवून आणल्या. त्यातून माळीसागज गावात खरीप २०१९ मध्ये ३७ शेतकऱ्यांनी २१२ टन मरूघास तयार केला. अल्पभूधारकांनी अन्य शेतकऱ्यांकडील मका विकत घेतला. प्लॅस्टिक पिशव्या व खड्डे पद्धत अशा दोन पद्धती वापरण्यात आल्या. मुक्त गोठा पध्दत असलेल्यांची संख्या १४ च्या आसपास असावी.

  योगेश गाडेकर- ७३८७११३२३२ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com