Agro : हरभरा उत्पादनासाठी `चारसूत्री’ वापरा

तालुका कृषी अधिकारी जारोंडे यांचा शेतकऱ्यांना सल्ला
gram Production
gram Productionsakal

भिवापूर : १५१६ मिलीमीटर असा विक्रमी पाऊस पडल्याने यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नगदी पिक समजले जाणाऱ्या कापूस व सोयाबीनपासून खूप काही हाती लागण्याची शक्यता कमी आहे. अशात शेतकऱ्यांनी आता रब्बी पिकाकडे लक्ष केंद्रित केले असून तालुक्यात रब्बी हंगामात अंदाजे २० हजार हेक्टरवर पेरा असणाऱ्या हरभरा पिकावर त्यांच्या आशा टिकून आहेत.

हरभऱ्याचे हमखास उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी चारसुत्रींचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी केले आहे. सततच्या पावसामुळे जमिन कायम ओली राहिली आहे. त्यामुळे शेतात हानिकारक बुरशींची मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. हरभरा पिकाला प्रामुख्याने मर व मुळकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो व त्यामुळे प्रचंड प्रमाणात उत्पादनात घट येते.

रोग लागल्यावर काहीच उपायोजना करता येत नाही व पिकाकडे हताशपणे बघण्याशिवाय पर्याय उरत नाही. ही परिस्थिती टाळण्यासाठी चार सुत्रींचा वापर करण्याचे आवाहन जारोंडे यांनी केले आहे. प्रथम सूत्र बीज प्रक्रिया हरभरा पिकाला प्रामुख्याने मर व मूळखुज रोगांकरिता ट्रायकोडर्मा या मित्र बुरशींची बियाण्याला प्रति किलो चार ते पाच ग्रॅम या प्रमाणात पेरणी अगोदर बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. रासायनिक बुरशीनाशके सुद्धा बीज प्रक्रिया करीता वापरता येतात.

त्याकरिता बियाण्यास टेबुकोनाझोल ५.४% W / डब्ल्यू एफएस या बुरशीनाशकाची चार मिली प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी रासायनिक व जैविक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशक वापरावे व त्यानंतर दिलेल्या प्रमाणापेक्षा दुप्पट प्रमाण वापरून जैविक घटकांची बीज प्रक्रिया करावी तसेच शेतात सुद्धा हेक्टरी तीन ते चार किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुचलेल्या शेणखतात मिसळून शेतात पसरून द्यावे.

जमिनीमध्ये ओल असेल त्याचवेळी टायकोडर्माचा वापर करावा. बीज प्रक्रियाकरिता जिवाणू खते किंवा लिक्विड कन्सलशियाचा वापर करावा. दुसरे सूत्र बीबीएफ यंत्राने पेरणी करावी. यंत्र उपलब्ध नसल्यास पट्टा पद्धतीने पेरणी करावी. सहा किंवा आठ तासानंतर दीड ते दोन फुटांचा एक पट्टा सोडणे आवश्यक आहे.

तिसरे सूत्र पिकाची पेरणी दोन ओळीत ४५ सेंटिमीटर अंतर ठेवून करावी व एकरी २० ते २५ किलो बियाणे पेरणीकरिता वापरावे. चौथे सूत्र हरभरा पिकाला ओलीत व्यवस्थापन करताना तुषार सिंचनानेच करावे व कीड व्यवस्थापन करताना सापळा पिके, पक्षी थांबे, कामगंध सापळे इत्यादींचा वापर करावा. त्यानंतर सुद्धा घाटे अळीच्या प्रादुर्भाव झालाच तर तेव्हा रासायनिक औषधी फवारणी करावी.

तर...समाधानकारक उत्पादन

हरभरा पिक व्यवस्थापन करताना वरीलप्रमाणे चार सूत्रीचा वापर केल्यास हमखास पिकाच्या उत्पादनात भर पडून बळीराजाला समाधानकारक उत्पादन मिळू शकते. त्यासाठी सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी चारसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com