बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

एव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक संसर्गजन्य रोग असून, सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो. हा रोग ‘एच ५ एन १’ या विषाणूमुळे होतो. यात पक्ष्यांची मरतूक ८० ते १०० टक्क्यांपर्यंत होते. या पार्श्‍वभूमीवर कोंबड्यामध्ये ‘बर्ड फ्लू’चे संक्रमण रोखण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांची माहिती घेऊ.

कोविड -१९ प्रादुर्भावाने संपूर्ण देश आधीच त्रस्त असताना देशाच्या विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’ (एच ५ एन १) मुळे पक्षी मृत झाल्याच्या बातम्या आल्या. यात हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, केरळ, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा राज्यांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर सन १८७८ मध्ये सुमारे १४० वर्षांपूर्वी उत्तर इटली येथे या रोगाची पहिली नोंद करण्यात आली आहे.

भारतात बर्ड फ्लू हा सर्वप्रथम १८ फेब्रुवारी २००६ मध्ये महाराष्ट्रातील नवापूर (जि. नंदुरबार) येथे आढळला होता. 

एव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक संसर्गजन्य रोग असून, सर्व प्रकारच्या पक्ष्यांमध्ये संक्रमित होतो. हा रोग ‘एच ५ एन १’ या विषाणूमुळे होतो. यात पक्ष्यांची मरतूक ८० ते १०० टक्क्यांपर्यंत होते. बर्ड फ्लू प्रादुर्भावाविषयी समजताच सध्या महाराष्ट्रातील सुमारे २५ टक्के मांस व अंडी विक्रीमध्ये घट झाल्याचे समजते. या पार्श्‍वभूमीवर कोंबड्यामध्ये ‘बर्ड फ्लू’चे  संक्रमण रोखण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांची माहिती घेऊ.

बर्ड फ्लू कशामुळे होतो? 
बर्ड फ्लू हा रोग आर्थोमिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होतो. या विषाणूच्या रचनेवरून त्यांचे टाइप ए, टाइप बी, टाइप सी आणि टाइप डी असे वर्गीकरण केले जाते. एन्फ्लूएन्जा टाइप ए हा विषाणू कोंबड्यासाठी अतिशय घातक असतो. या विषाणूच्या बाह्य आवरणावर १८ प्रकारची हिमएग्लूटीनीन(एच) व ११ प्रकारची न्युरामिनिडेज (एन) नावाची प्रथिने असतात. 

एखाद्या विषाणूवर कोणत्या प्रकारची प्रथिने असतात, त्यानुसार त्यांचे उपवर्ग ठरतात. उदा. एच १ एन १; एच १ एन ८; एच २ एन९, एच३ एन२,  एच ५ एन१, एच ५ एन८; एच ५ एन९, एच ६ एन २ अशा प्रकारे सुमारे १४४ उपवर्गात त्यांचे वर्गीकरण करता येते. भारतात आलेला बर्ड फ्लू हा रोग ‘एच ५ एन १’ या विषाणूंमुळे संक्रमित झाला आहे.

बर्ड फ्लूचा प्रसार कसा होतो? 
जलाशयातील जंगली पक्षी हे सर्व एव्हीयन इन्फ्लूएन्झा ए (बर्ड फ्लू) व्हायरसचा नैसर्गिक स्रोत मानला जातो. बहुतेक संक्रमित पक्षी संसर्गजन्य विषाणू मोठ्या संख्येने बाहेर टाकत असतानाही कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत. लक्षणे न दर्शवता हे पक्षी विषाणूचे ‘मूक’ स्रोत म्हणून काम करतात. ते इतर पक्ष्यांपर्यंत प्रादुर्भाव पोहोचवतात. पाळीव जलाशय पक्षी (उदा. बदके, हंस इ.) हे जंगली जलाशयातील पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने संक्रमण होऊ शकते. त्यांच्यामार्फत पाळीव देशी कोंबड्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सामान्यत: वन्य पक्ष्यांमधून कमी तीव्रतेचा रोगकारक विषाणू संक्रमित झाला असला, तरी पाळीव पक्ष्यामध्ये तो आपले स्वरूप बदलू शकतो. अत्यंत रोगजनक एव्हीयन इन्फ्लूएंझाचा (बर्ड फ्लू) प्रादुर्भाव होऊ शकतो.

कोंबड्यांतील बर्ड फ्लूची लक्षणे
कोंबड्यांमध्ये फ्लूची लक्षणे तीव्र स्वरूपात दिसून येतात. या विषाणूचा रोग निर्माण करण्याचा काळ काही तास ते १४ दिवस एवढा असतो. कोंबड्या काही तासातच किंवा एक दोन दिवसांत मृत्युमुखी पडतात. 

  • प्रथमत: कोंबड्यांचे खाणे पिणे बंद होऊन ते सुस्तावतात. 
  • नाका तोंडातून रक्तमिश्रित स्राव बाहेर येतो. 
  • तोंडाचा व डोक्याचा भाग सुजलेला दिसतो. 
  • डोळ्यांच्या पापण्याच्या आतील भाग लाल होतो व सुजलेला दिसतो. 
  • विष्ठा हिरव्या रंगाची होते व पायांना सूज येते. 
  • पक्षी चालताना अडखळतात. पंख विखुरतात व गळतात, पक्षी निस्तेज दिसतात.
  • अंडी उत्पन्न कमी होते.
  • श्‍वसनाचा त्रास होतो, शिंका येतात व श्‍वास घेताना घरघर आवाज येतो. श्‍वासोच्छ्‌वासात अडथळे येऊन पक्षी दगावतात.

कोंबडीचे मांस व अंडी खाणे सुरक्षित आहे का? 

  • रोगाचा प्रादुर्भाव नसलेल्या व रोगमुक्त भागामध्ये मांस व अंडी नेहमीप्रमाणे खाणे शक्य आहे. बर्ड फ्लूच्या विषाणूचा संसर्ग होण्याची भीती नाही. 
  • ज्या भागात प्रादुर्भाव आहे, तिथेही अंडी व मांस यांचा आहारात सुरक्षितपणे वापर केला जाऊ शकतो. बर्ड फ्लूचा विषाणू ७० अंश सेल्सिअस तापमानामध्ये नाश पावतो. आपल्या स्वयंपाक पद्धतीमध्ये सामान्यपणे यापेक्षा जास्त तापमान असून, ते विषाणूचा नाश करते. तरीही हे पदार्थ तयार करताना उकळी येईपर्यंत किमान अर्धा तास शिजवले जाते का, याकडे लक्ष द्यावे. 
  • योग्य प्रकारे शिजवलेल्या अन्नातून बर्ड फ्लू प्रसारित होत असल्याचा आजपर्यंत एकही पुरावे आढळलेला नाही. त्यामुळे विनाकारण भीती करणे व पसरवणे टाळावे.
  • भारतात बर्ड फ्लू विषाणूमुळे एकाही मानवी मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र कुक्कुटपालन करणाऱ्या लोकांनी पक्षी हाताळताना पीपीई, ग्लोव्हज आणि मास्क घालणे, हात धुणे यांसारख्या विशेष काळजी अवश्य घ्यावी. 

परसबागेतील, देशी पक्ष्यांची काळजी

  • देशी कोंबड्यांना शक्य झाल्यास काही दिवस बाहेर पडू देऊ नका. शेजारच्या कोंबड्या, कावळा, कबुतरे यासारखे पक्षी यांच्यासोबत मिसळू देऊ नाहीत.
  • अंगण आणि परिसर स्वच्छ ठेवा आणि कचरा नियमितपणे जाळून  टाका.  
  • जंगली किंवा स्थलांतरित पक्षी पकडू नका. पिंजऱ्यात पक्षी ठेवू नका. 
  • मृत पक्षी नाल्यांमध्ये किंवा मोकळ्या जागेत टाकू नका.  
  • लक्षणे आढळल्यास नजीकच्या शासकीय सेवेतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करा.

प्रतिबंधात्मक उपाय 
बर्ड फ्लू नियंत्रित जैव-सुरक्षाविषयक उपाययोजनांचे कडकपणे पालन केले पाहिजे. 
पक्षी सध्या संक्रमित नसले तरी सर्व कुक्कुटपालकांनी आपल्या फार्मवर प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत.

  • कुक्कुटपालनात एकसमान वयोगटाचे पक्षी पाळण्याचे धोरण अवलंबावे. याला  ‘ऑल इन, ऑल आउट’ उत्पादन प्रणाली  म्हणतात. यात एक दिवसाची पिल्ले आणून, ती सर्व एकाच दिवशी विकायची.
  • देशी, ब्रॉयलर व अंडी देणारे पक्षी जंगली किंवा स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कात येऊ देऊ नयेत. 
  • वन्य पक्ष्यांचा वावर असलेल्या व त्यांच्यामुळे दूषित होण्याची शक्यता असलेल्या पाण्याच्या कोणत्याही स्रोतापासून कोंबड्यांना दूर ठेवावे. फार्मवर जंगली पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करू नये.
  • केवळ आवश्यक कामगार आणि वाहनांना फार्मवर प्रवेश करण्याची परवानगी द्यावी.
  • फार्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छ कपडे आणि निर्जंतुकीकरणाच्या सुविधा पुरवाव्यात.
  • फार्मवर प्रवेश करताना व बाहेर पडताना उपकरणे आणि वाहने (टायर्स आणि अंतगर्भागासह) पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करावे. -फार्मच्या कुंपणातील गेटवर वाहनाच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘व्हेइकल डीप’ तयार करावे. त्यात पोटॅशिअम परमॅग्नेटचे द्रावण भरलेले असावे. फार्मवर येणाऱ्या सर्व वाहनांचे (कार, ट्रक) त्या द्रावणातून येतील, हे पाहावे. 
  • संक्रमित परिसरात विषाणूचे प्रमाण कमी होण्याकरिता सोडिअम हायपोक्लोराइट २ टक्के किंवा फॉर्मेलिन ४ टक्के या सारख्या जंतुनाशक फवारण्या नियमितपणे कराव्यात. त्यातून निर्जंतुकीकरणाला मदत होते. 
  • ७ ग्रॅम धुण्याचा सोडा प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिश्रणाने फार्म परिसर, नाले, गावातील गटारी व इतर स्थळे या मध्ये फवारणी करावी. ही फवारणी दर १५ दिवसांनी केल्यास विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. 
  • अन्य कोणत्याही फार्मवरून उपकरणे किंवा वाहने, खाद्य, पाणी यांची देवाणघेवाण टाळावी. 
  • अन्य पोल्ट्री फार्मला भेट देणे टाळावे.

- डॉ. एम. आर. वडे, ८६००६२६४००
(सहायक  प्राध्यापक, कुक्कुट संशोधन केंद्र, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com