सावरत असताना पुन्हा आमच्या स्वप्नांवर पाणी

tanaji--shingade
tanaji--shingade

पुणे - आधी चक्रीवादळाचा फटका, त्यानंतर निष्कृष्ट बियाण्यांमुळे झालेले नुकसान आणि आता परतीच्या पावसाने दिलेला दणका यामुळे शेतकऱ्यांवर संकटांची मालिकाच सुरु आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे तर पिके होत्याची नव्हती झाली. आधीच दुष्काळाच्या खाईतून सावरत असताना पुन्हा आमच्या स्वप्नांवर अस्मानी संकट कोसळल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

खरीप हंगामात पावसाने लवकर हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे  नियोजन केले. पेरण्या केल्या. मात्र, पंधरा दिवस जाऊनही बाजरी आणि सोयाबीन बियाण्याची उगवण झाली नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा पेरणी करून हातात काहीतरी मिळेल अशी आशा होती. मात्र, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हा तालुक्यांत मुसळधार झाला. यामुळे पश्चिमेकडील भात खाचरात अति पाणी झाले. पूर्वेकडील उजनी धरणाच्या पाणलोटक्षेत्रातही पाणी वाढल्याने अनेकांची पिके पाण्याखाली गेली. यामुळे भात, बटाटा, बाजरी, मूग, वाटाणा, उडीद, सोयाबीन, ऊस, फळबागा, भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले. पुन्हा सावरण्याची ताकद नाही, सरकारने आता तरी किमान आधार द्यावा, अशी अपेक्षा कडबनवाडी येथील (ता. इंदापूर) येथील तानाजी शिंगाडे यांनी केली.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘माझ्याकडे साडेतीन एकरांवर शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत होतो. आधीच कोरोनामुळे कमी दरामुळे अडचणीत आलो होतो. झालेला खर्च ही निघत नसल्याने बँकेकडून घेतलेले सहा लाख रुपयांचे कर्ज कसे भरायचे, असा प्रश्न होता. त्यातच  पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. शेडनेटमधील सर्व ढोबळी मिरचीचे नुकसान झाले. पाइप वाकले, शेडनेट फाटल्याने, माती वाहून गेली, ठिबक वाहून गेले, पिकांचे जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. आता पंचनामे सुरू असले तरी नुकसानभरपाई कधी मिळते हा प्रश्न आहे. शासनाने शेडनेट व पॉलिहाउसधारकांना ५० टक्के नुकसानभरपाई द्यावी,’’ अशी मागणी श्री शिंगाडे यांनी केली.

परतीच्या पावसामुळे अडीच एकरांवरील उसाचे नुकसान झाले. त्यासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च आला होता. यंदा ऊस गेल्यानंतर जवळपास तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले असते. परंतु पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने कमीत कमी एकरी ५० हजार रूपये मदत करावी, अशी अपेक्षा आहे. आता जी मदत जाहीर केलेली आहे, ती सुद्धा तुटपुंजी आहे. त्यातून काहीच फायदा होणार नाही.
 -  माउली सोलनकर,  शेतकरी, भिगवण, ता. इंदापूर

माझ्याकडे एकूण वीस एकर शेती आहे. त्यामध्ये ज्वारी, बाजरी, कांदा आणि ऊस, मका अशी पिके होती. सतत होत असलेल्या  पावसामुळे शेतातून पाणी वाहत आहे. जवळपास दहा एकरांतील पिके पाण्यात असल्याने मोठे नुकसान झाले. त्यासाठी पाच लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. ते फेडायचा पण प्रश्न आहे. 
- राजेंद्र वावगे,  शेतकरी, सोनवडी, सुपे, ता. बारामती

हेही वाचा : दुग्ध व्यवसायातून पुढारले माळीसागज 

इंदापुरात सर्वाधिक पावसाची नोंद
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याची सरासरी ६०.२ मिलिमीटर आहे. त्यापैकी १ ते २४ ऑक्टोबर दरम्यान २११ मिलिमीटर पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक पाऊस इंदापूर तालुक्यात झाला. इंदापूरची सरासरी ६४.६ मिलिमीटर असून ३१९.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. हवेलीत २६५, मुळशी २१५, भोर २०२, मावळ १४६, जुन्नर ९२.१ खेड १८३.४, आंबेगाव १७३.४,शिरूर १७७.७, बारामती २७८.४, दौंड २१८.३, पुरंदर २५१.० मिलिमीटर पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
तालुका    झालेले नुकसान
बारामती    ७,०००
इंदापूर    १२,५०६
दौंड    ४५२६
पुरंदर    ७५०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com