Child Marriage : चार वर्षांत रोखले ३०० बालविवाह

मागील चार वर्षांत ३०० पेक्षा जास्त बालविवाह रोखण्यात स्नेहालयाने यश मिळविले.
Marriage
Marriagesakal

अहमदनगर - मागील चार वर्षांत ३०० पेक्षा जास्त बालविवाह रोखण्यात स्नेहालयाने यश मिळविले. जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याकरिता स्नेहालय अंतर्गत उडान या प्रकल्पाची नव्याने संरचना केली आहे. हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यासाठी बालविवाहास बळी पडणाऱ्या बालकांना शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि पुनर्वसन करण्यासाठी काम करेल. त्यातून अनेक बालकांचे जीवन सावरले जाणार आहे.

स्नेहालय संचलित हा उडान प्रकल्प, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईनतर्फे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (ता.१४) बालदिन कार्यक्रम आयोजित केला आहे. शहरातील गांधी मैदानातील स्नेहालय भवनात सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा बालविवाह मुक्त घडविण्यासाठी स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे लोकार्पण व बालविवाह मुक्ती मिशनचे उदघाटन राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर व पत्रकार मन्सूर शेख यांच्या हस्ते होणार आहे.

स्नेहालय संस्था ही मागील ३३ वर्षांपासून वंचित घटकांसाठी काम करते. बालविवाह या समस्या निवारणासाठी स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर, उडान प्रकल्पाचे मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, अनिवासी प्रकल्पाचे संचालक हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहालयाने जिल्हा प्रशासनासोबत उडान बालविवाह प्रतिबंधक अभियान जिल्ह्यात राबवित आहेत.

बालदिन बालविवाह मुक्ती मिशन कार्यक्रमांतर्गत बालविवाह व हक्क वंचित बालकांपर्यंत पोहोचण्याकरिता व त्या बालकांना काळजी, संरक्षण, शिक्षण आणि भविष्य देणाऱ्या सुसंघटित स्वयंसेवक, बालमित्र व सामान्य लोक गटाची निर्मिती केली जाणार आहे. शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी सहसंबंध प्रस्थापित करून बालकांच्या अधिकाराविषयी जनजागृती केली जाणार आहे. उपाय, कार्यवाहीविषयी माहिती दिली जाणार आहे.

जनजागृती कार्यक्रम

२० नोव्हेंबरला शहरातील महत्त्वाच्या झोपडपट्टीच्या ठिकाणी बालविवाह व बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाची जनजागृती केली जाणार आहे. २३ रोजी नगर तालुक्यातील लग्न लावणारे व्यवस्थापिक घटक यांच्या उपस्थितीमध्ये बालविवाह एक अभिशाप हा मेळावा शहरातील पोलिस ठाण्यांच्या सहकार्याने घेतला जाणार आहे. २६ व २७ रोजी युवक मेळावा घेतला जाणार आहे. बसस्थानक, कापड बाजार आदी ठिकाणी बालविवाह प्रतिबंधाचे पोस्टर लावून जनजागृती केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com