पारनेर (अहमदनगर) : कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय आणि नियंत्रण समितीची स्थापना करून त्यात आमदार निलेश लंके यांच्याप्रमाणे ज्यांनी लोकसहभागातून काम केले, अशा लोकप्रतिनिधींचा समोवश करण्याची मागणी अण्णा हजारे प्रणित नगर जिल्हा स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचा तुटवडा, रेमडेसिव्हीर आणि इतर औषधांची टंचाई आणि काळाबाजार तसेच काही खाजगी रूग्णालयांकडून लावली जाणारी भरमसाठ बिले अशा परिस्थितीत लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे.
लवकरच लोकांच्या भुकेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, सामाजिक संस्था आणि संघटना यांचे प्रतिनिधी, वैद्यकिय व्यवसायातील जबाबदार डॉक्टर्स, संवेदनशील आणि प्रत्यक्ष कृतिशील असलेल्या आमदार लंके यांच्यासारखे लोकप्रतिनिधी, धार्मिक, सहकारी आणि शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वय आणि नियंत्रण समितीकडे सध्याच्या स्थितीतील सर्व निर्णय अधिकार दिले जावेत, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.
जिल्हयाचे पालकमंत्री, इतर मंत्री यांचा अपवाद वगळता आमदार आणि खासदार सध्या समन्वयासाठी व लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे संभाव्य आराजकाची परिस्थिती टाळण्यासाठी अशा समन्वय समितीचा उपयोग होईल, अशी आशा या पदाधिका-यांनी व्यक्त केली आहे.
या पत्रावर शाम आसावा, अजित माने, अनिकेत कौर, सुलक्षणा अहिरे, पुजा पोपळघट, शबाना शेख, शाहिद शेख, अजित कुलकर्णी, तुलसीभाई पालीवाल, मिरेन गायकवाड, अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी, प्रियंका सोनवणे, प्रवीण मित्याल, विपुल शेटीया, नाना भोरे, किशोर मुनोत, महेश सुर्यवंशी, सागर फुलारी, हनिफ शेख यांच्या सहया आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.