
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू : थोरात
नगर : ‘‘पुणतांबे येथील आंदोलनकर्त्यांनी मांडलेले प्रश्न, मुद्दे राज्य शासनाशी निगडित आहेत. राज्य मंत्रिमंडळामध्ये हे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी आग्रह धरू,’’ असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. ‘‘काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी हिताची भूमिका घेत असून शेतकरी प्रश्न सुटले पाहिजेत, असे आम्हालाही वाटते,’’ अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.
राहता तालुक्यातील पुणतांबाे येथे बुधवारपासून (ता.१) शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला थोरात आणि पटोले यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. दरम्यान, आंदोलकांनी गुरुवारी कांदा, फळांचे मोफत वाटप करून सरकारचा निषेध केला. पाच तारखेपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहील. त्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
थोरात म्हणाले, ‘‘पुणतांबे गावातील ग्रामस्थांनी ज्या शेतकरी प्रश्नावर आंदोलन सुरू केले आहे, ते जवळपास सर्व प्रश्न राज्य शासनाशी निगडीत आहेत. हे प्रश्न सुटावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, ही काँग्रेसची भूमिका आहे. शक्य झाले तर संगमनेरला या, तेथे चर्चा करू. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या साठी कांदा, गहू, साखर निर्यातही सुरू राहिली पाहिजे. त्यामुळे पैसा खेळता राहतो.’’ पटोले म्हणाले,‘‘राज्य अथवा देशपातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.’’
‘आता पळापळ सुरू होईल’
मंत्री थोरात यांनी, ‘‘आम्ही पुणतांबा येथील आंदोलनाला भेट दिल्याचे कळताच इतर पुढाऱ्यांची पळापळ सुरू होईल,’’ असा टोमणा विरोधकांना मारला. ‘‘भाषणे ठोकली जातील. तुम्ही सुरू केलेले आंदोलन पाच तारखेपर्यंत सुरू राहू द्या. मागण्यांवर तोडगा निघेलच,’’ असा आशावाद देखील थोरात यांनी व्यक्त केला.
Web Title: Agitation In Puntambe Balasaheb Thorat Solve The Problems Of Farmers Ahmednagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..