Karjat Grampanchayat Election: कर्जत तालुक्यातील अठरा गावांच्या कारभाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वेध लागले असून, या निवडणुका लोकसभा निवडणुकी अगोदर होणार की नंतर याची मोठी उत्सुकता गावोगावी दिसून येत आहे.
राशीन, परीटवाडी, देशमुखवाडी, तोरकडवाडी, काळेवाडी, सोनाळवाडी, कानगुडवाडी, लोणी मसदपूर, आंबीजळगाव, खातगाव, जळकेवाडी, बिटकेवाडी, शिंदे, माही, सीतपूर, नवसरवाडी, निंबोडी, जळगाव या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल केव्हाही वाजू शकतो, हा विचार करून गावगाड्यातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
गावाच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी मतांच्या जुळवाजुळवीची गणिते कशी सोपी होतील, याचे अडाखे बांधत प्रतिस्पर्ध्यांचा अंदाज घेत, मरगळलेल्या गावच्या राजकारणात उभारी येऊ लागली आहे.
गावागावांतील पारावर, चावडीवर आणि चहाच्या टपऱ्यांवर गावातील राजकारणाच्या गप्पा झडू लागल्या आहेत. गेली पाच वर्षे जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर मूग गिळून गप्प बसलेल्या राजकीय विरोधकांनी या निवडणुकीसाठी लंगोट लावून दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. सरपंचपद हे लोकनियुक्त असल्याने प्रत्येक गाव काय भूमिका घेऊन जनता कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार आणि सरपंचपदाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी कोण-कोण रिंगणात उतरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Latest Marathi News)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही प्रत्येक गावात मूलभूत प्रश्न आजही ''आ'' वासून उभे असल्याने या निवडणुका वीज, पाणी, गटार, स्वच्छता आणि अंतर्गत रस्ते या प्रश्नांच्या आश्वासनावर लढल्या जाणार आहेत. व्हिजन नसणाऱ्या नेतृत्वाअभावी गावांचा मूलभूत आणि भौतिक विकास रखडल्याचे चित्र असून, गेल्या निवडणुकीत गावचा चेहरामोहरा बदलण्याचे अनेकांचे आश्वासन हवेत विरल्याने या निवडणुकीत त्याचा पुनरुच्चार होणार आहे.
अठरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम रखरखणाऱ्या उन्हाच्या काहिलीत आणि पाणीटंचाईच्या काळात होणार असल्याने गावगाड्यातील राजकारण आणखी तापणार असून, या तापलेल्या राजकारणावर जे राजकारणी आपली पोळी शिताफीने आणि हुशारीने भाजून घेतील, ते पुन्हा गावचे कारभारी होतील.(Latest Marathi News)
तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या गावांच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे. आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे हे दोघेही कोणत्याही गावाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष लक्ष घालणार नाहीत. मात्र, कोणते गाव कोणाच्या पारड्यात
माप टाकतेय, हे दोघेही डोळ्यांत तेल घालून पाहणार आहेत. त्यामुळे राजकारण गावगाड्याचे असले, तरी त्याचे मूल्य विधानसभेसाठी खास ठरणार आहे.
जाब विचारणार की धडा शिकवणार...
सत्तेच्या कार्यकाळात लोकांच्या किमान मूलभूत गरजा पूर्ण न करणाऱ्या आणि पंधरा-पंधरा दिवस पाण्यासाठी ताटकळत ठेवणाऱ्या आणि पिण्याचे पाणी विकत घेण्यास भाग पडणाऱ्या निष्क्रिय सत्ताधाऱ्यांना आणि या प्रश्नाबाबत मिठाची गुळणी धरलेल्या विरोधकांना गावोगावची जनता या निवडणुकीत जाब विचारणार की त्यांना निवडणुकीतून धडा शिकवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.