संजय आ. काटे सकाळ वृत्तसेवा
श्रीगोंदे - अहमदनगर बेळगाव या साडेसहाशे कोटींच्या महामार्ग प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अर्थात, अरणगाव व चिखली घाट येथे कॉँक्रिटीकरण नव्हे, तर डांबरीकरणावर भागवले आहे. लोणीव्यंकनाथ रेल्वे क्रॉसिंगचा रस्ता निधीचा गाजावाजा होऊनही अर्धवट आहे. हे सगळे असतानाच महामार्गाला अनेक ठिकाणी भेगा पडत आहेत, तर काही ठिकाणी साइडपट्ट्या खचल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.
वर्षानुवर्षांची अहमदनगर-दौंड या बिकट रस्त्याची वाट सुखद होण्यासाठी निधी पडला. सिमेंट क्राँक्रिटीकरणाचा रस्ता काही भाग वगळता पूर्ण होत आला आहे. अर्थात, ठेकेदाराने केलेल्या कामांना काही ठिकाणी तडे गेलेले आहेत. दरम्यान, चिखली घाटातील रस्ता वाढविताना तेथील वन विभागाची मंजुरी आवश्यक होती, मात्र ती मिळाली की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण, त्या भागात डांबरीकरणाचेच काम झाले आहे. घाटातील रस्ता अत्यंत अडचणीचा असून, तेथे वाढीव रस्ता आवश्यक आहे.
दरम्यान, रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, दुरुस्ती सतत सुरू असते. काही वर्षांचा रस्ता खराब कसा झाला, याचे गणित उलगडत नाही. काही भागात साइडपट्ट्या खचल्याने अपघातांत वाढ झाली आहे. लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे क्रॉसिंगसाठी उड्डाणपूल होणार असल्याचे अजूनही सांगितले जाते.
तथापि, त्यासाठीही रेल्वेची परवानगी मिळाली की नाही हे खात्रीशीर समजत नाही. कदाचित मिळाली असली तर कामाला वेग का नाही, हेही समजत नाही. त्यातच खासदार सुजय विखे यांनी तेथील रस्त्याचे काम करण्यासाठी वाढीव साडेतीन कोटींचा निधी मंजूर करून आणला. तोही रस्ता अजून पूर्ण नाही. रस्त्याचे काम होण्यापूर्वीच या सगळ्या मंजुरी व ना-हरकत संबंधित ठेकेदाराने घेणे बंधनकारक असल्याचे प्रकल्प अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तरीही ती घेतली नसल्याचे दिसते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.