Ahmednagar : संगमनेर शहरातील प्रवरा नदीपात्रातून अनेक वर्षांपासून अविरत वाळूतस्करी सुरू

नागरिकांकडून गोण्या नदीत रिकाम्या ः प्रशासनाचा निषेध
वाळूतस्करी
वाळूतस्करी sakal

संगमनेर : प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करणाऱ्या घोषणा देत, शहरातील संतप्त नागरिकांनी आज (बुधवारी) सकाळी प्रवरा नदीवरील गंगामाई घाटावर तस्करांनी ठेवलेल्या वाळूच्या गोण्या नदीपात्रात रिकाम्या केल्या. तसेच ठिय्या आंदोलन करीत, नदीकाठावर पुन्हा वाळूची रिक्षा दिसल्यास जाळून टाकण्याचा इशारा दिला.

संगमनेर शहरातील प्रवरा नदीपात्रातून अनेक वर्षांपासून अविरत वाळूतस्करी सुरू असल्याची ओरड होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न तुटपुंजे ठरले आहेत. यापूर्वी शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ झालेल्या खड्ड्यांमध्ये झोपून आंदोलन केले होते. मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याने जुनाट रिक्षांमधून काही जण दिवसभर शहरातील विविध बांधकामांवर वाळूपुरवठा करत आहेत. आवर्तन काळातही वाळू उपसून बेदरकारपणे रिक्षातून वाळू वाहतूक करत आहेत. काही जण त्यासाठी गाढवांचाही वापर करतात.

या परिसरात पहाटे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना धूर ओकणाऱ्या या रिक्षांचा त्रास व चालकांची अरेरावी, शिवीगाळ सहन करावी लागते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे कानाडोळा करते.

दोनशे नागरिकांनी आक्रमक होत घाटावरील वाळूच्या गोण्या पुन्हा नदी रिकाम्या करून जाळून नष्ट केल्या. संगमनेरचे तलाठी पोमल तोरणे यांना घटनास्थळी बोलावून चांगलेच धारेवर धरले. महसूल विभाग वाळूतस्करी रोखू शकत नसेल, तर नागरिक कायदा हातात घेऊन चालकांसह रिक्षा पेटवून देतील. त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा दिला. राज्यात सत्तापरिवर्तनानंतर महसूलमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात नवीन वाळू धोरणाची घोषणा करीत, अवैध वाळूतस्करीला लगाम घातल्याचा केलेला दावा संगमनेरात तरी पोकळ ठरला आहे.

प्रवरा नदीच्या पवित्र घाटाला वाळूतस्करांनी स्मशानकळा आणली आहे. नशापाणी करुन भरधाव वेगात चालणाऱ्या रिक्षांमुळे या परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यांचे धारिष्ट्य पाहता, त्यांना प्रशासनाचे पाठबळ असल्याची शंका घेण्यास वाव आहे. आज केलेल्या आंदोलनानंतर मुख्याधिकारी व पोलिसांना निवेदन दिले आहे. १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू.

- भाऊ जाखडी, अध्यक्ष, संगमनेर पुरोहित संघ

वाळू तस्करांविरोधात कारवाईत संगमनेर तालुका आघाडीवर आहे. त्यानंतरही कारवाया सुरुच राहणार आहेत. याबाबत मुख्याधिकारी व पोलिस प्रशासनाशी चर्चा करू. तस्करांना अटकाव करण्यासाठी पोलिसांची अतिरीक्त मदत मिळावी, यासाठी पत्रव्यवहार करीत आहोत. शहरातील नागरिकांनी चोरट्या मार्गाने वाळू खरेदी करू नये.

- अमोल निकम, तहसीलदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com