शिर्डी - बहुचर्चित निळवंडे धरणात गेल्या दहा वर्षांपासून पाणी साठते. मात्र कालवे नसल्याने आजवर दुष्काळी लाभक्षेत्र कोरडेच राहायचे. यंदा ऐन दुष्काळात या धरणात तब्बल साडेसात टीएमसी पाणी साठले. डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले, मात्र पाणी बाहेर काढण्यासाठी या कालव्यास ठिकठिकाणी दरवाजे बसविण्यात आले नाहीत.
त्यामुळे धरण भरले आणि लाभक्षेत्रातील खरिपाची पिके पाण्याअभावी नष्ट झाल्याचा दुर्दैवी अनुभव शेतकऱ्यांच्या नशिबी आला. आता किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी डाव्या कालव्यातून पाणी सोडा, या मागणीसाठी येत्या १३ सप्टेंबरला निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने निळवंडे जलसंपदा कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
निळवंडे दुष्काळी टापूत आता पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे चटके बसायला सुरवात झाली. शेतातील पिके तर केव्हाच हातची गेली. आता जनावरांना पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न येत्या काही दिवसांत या भागात निर्माण होईल. ही परिस्थिती लक्षात घेऊन निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडावे.
शक्य होईल त्या ठिकाणी आणि शक्य होईल त्या पद्धतीने पाणी कालव्याच्या बाहेर काढून ते बंधारे व ओढे-नाल्यांत साठवावे. त्यामुळे किमान पिण्याच्या पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल, अशी या दुष्काळी टापूतील शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी आवर्तन सोडण्याची तयारी जलसंपदा विभागाने दाखविली आहे.
मात्र, अकोले मेहेंदुरीजवळ एसकेएफ म्हणजे आणीबाणीच्या प्रसंगी पाणी बाहेर काढण्याच्या व्यवस्थेचे काम सुरू झाले. कॉँक्रिटीकरणाचे हे काम पूर्ण व्हायला अद्याप दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागेल. जेवढ्या लवकर हे काम पूर्ण होईल, तेवढ्या लवकर कालव्यात पाणी सोडता येईल. चाचणीच्या वेळी जेथे कालवा पाझरून शेतक-यांचे नुकसान झाले, गळती काढण्याचे काम तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. आज खासदार सदाशिव लोखंडे यांनी हे काम सुरू करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
बंधारे भरल्यास पिण्यास पाणी
निळवंडे डाव्या कालव्यातून दुष्काळी टापूतील साठ ते सत्तर गावांतील बंधारे व ओढ्या-नाल्यांत पाणी सोडण्याची पूर्वतयारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापासूनच करणे गरजेचे आहे. लोहारे येथून पाणी बाहेर काढले, तर आडगाव, पिंपरी लोकाई, खडकेवाके, पिंपळस, दहेगाव या दुष्काळी भागातील बंधाऱ्यांत हे पाणी साठवून पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी करण्यास हातभार लावता येईल. पुढे हे पाणी राहाता, पिंपळवाडी व पुणतांब्यापर्यंत नेणे शक्य आहे.
कालव्यातून पाणी सोडा
कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके म्हणाले, की निळवंडे डाव्या कालव्यातून तातडीने पिण्यासाठी पाणी सोडावे. उजव्या कालव्याच्या कामास वेग द्यावा. उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम वेगाने पूर्ण करावे, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी आम्ही संगमनेर येथील निळवंडे जलसंपदा कार्यालयावर मोर्चा नेणार आहोत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.