आमदार रोहित पवारांची ग्रामस्थांना साद; बिनविरोध ग्रामपंचायतींना ३० लाख निधी देण्याची घोषणा

Announcing to give 30 lakh funds to Gram Panchayats without any objection
Announcing to give 30 lakh funds to Gram Panchayats without any objection

जामखेड (अहमदनगर) : कोरोना महामारीने व नैसर्गिक संकटाने अगोदरच आपल्याला खुप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट- तट बाजुला ठेऊन निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चास फाटा देत गावच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. 

आर्थिक खर्च वाचवण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांना देखील संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांनो, आपल्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी कर्जत- जामखेड तालुक्यातील निवडणुक कार्यक्रम लागलेल्या गावांतील नागरिकांना घातली आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कर्जत तालुक्यातील सुमारे ५६ तर जामखेड तालुक्यातील ४९ गावांच्या ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी ही घोषणा केली आहे. बिनविरोध निवडणुका पार पाडलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना सीएसआर फंडाच्या माध्यमातूनही अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासुनच आमदार पवार यांनी मतदारसंघाचा कुटुंबप्रमुख म्हणुन आपली भुमिका पार पाडत विविध उपक्रमांतुन मदत केली आहे.कोणत्याही अडचणीच्या काळात संकटात सापडलेल्या लोकांना पक्ष, गट- तट, राजकारण विरहित भावनेतून त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे.

गाव पातळीवर अधिक योजना व त्यांची माहिती पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी विकास समित्या स्थापन करून गावांना सक्षम करण्यासाठी त्यांच्याकडून विविध संकल्पना राबवल्या जात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघते. गावच्या सलोख्यास बाधा पोहोचते आणि गटा-तटाच्या राजकारणात गावचा विकास खुंटतो. सध्याच्या काळात प्रत्येक व्यवसायाला आणि त्यात काम करणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा फटका बसला आहे. प्रशासनावरही याचा ताण अधिक वाढला आहे.

अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांना खुप मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे 'बिनविरोध निवडणूक' ही प्रक्रिया गावच्या हिताची ठरणार आहे.त्यामुळे आमदार.रोहित पवारांची ही साद साहजिकच बिनविरोध निवडणुका पार पाडणाऱ्या गावांसाठी विकासाच्या दृष्टीने फायद्याची असुन अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी सर्वच सुजाण नागरिक प्रयत्नशील असतील असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला आहे.

...तर याद राखा,गाठ माझ्याशी आहे!
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य काही मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कशीच गय केली जाणार नाही. असा कोणताही प्रकार कुणी करू नये अन्यथा, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे! असा सज्जड दमच आमदार रोहित पवारांनी या निमित्ताने भरला आहे. त्यामुळे रोहित पवार यांचे ग्रामपंचायत कारभारावरही लक्ष असल्याचे अधोरेखित होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com