नगर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने गावशिवारात टंचाईचे सावट जाणवत आहे. पाहता पाहता टॅंकरने शतक पार केले. जिल्ह्यातील 93 गावे व 403 वाड्या-वस्त्यांवरील एक लाख 83 हजार 738 नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे 103 टॅंकर धावत आहेत.
गतवर्षी पावसाने जिल्ह्यात कहर केला. त्यामुळे टॅंकरच्या संख्येने 18 वर्षांचे "रेकॉर्ड' मोडत नवा उच्चांक गाठला. जिल्ह्यातील 572 गावे व 3200 वाड्या-वस्त्यांवरील साडेतेरा लाख नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाला तब्बल 827 टॅंकर सुरू करावे लागले होते. मात्र, नंतर परतीच्या पावसाने धुवाधार बरसात केली. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची स्थिती चांगली राहिली. परिणामी, टॅंकरची मागणी उशिरा आली.
यंदा एप्रिलच्या सुरवातीला जिल्ह्याच्या पठार भागातून टॅंकरचे प्रस्ताव येण्यास सुरवात झाली. सुरवातीला टॅंकरमंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम लक्षात घेऊन सरकारने ते प्रांताधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी व राहाता हे तालुके वगळता आजअखेर जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये टॅंकरद्वारे तब्बल एक लाख 84 हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासन करीत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कोणाचीही अडचण होणार नाही, याबाबत प्रशासन दक्षता घेत आहे.
तालुकानिहाय टॅंकर
जामखेड-19
नगर-19
पारनेर-18
कर्जत-15
संगमनेर-11
पाथर्डी-08
श्रीगोंदे-06
शेवगाव-04
अकोले-02
नेवासे-01
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.