नगर ः सोशल मीडियावरील एका ऍपच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिक्षण समितीची आज सभा झाली. मात्र, सभेदरम्यान सातत्याने नेटवर्कचा अडथळा येत असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
सभा व्यवस्थित होऊ शकत नसेल, तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे कसे दिले जातात, असा सवाल जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - ही व्यक्ती झाली कोरोनामुक्त
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित केल्याने शिक्षण समितीची सभा सभागृहाऐवजी आज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. मात्र, सदस्यांना एकमेकांचा आवाज येत नव्हता. शिवाय एकमेकांचे चेहरेही नीट दिसत नव्हते. त्यावरून वाकचौरे यांनी नाराजी व्यक्त केली.
सोशल मीडियातून सभाच व्यवस्थित होत नसेल, कोण काय बोलतो, हे कळत नसेल, तर मग या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसे शिकविले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे अध्यापन करून त्यांच्या शैक्षणिक नुकसानीसह शारीरिक व्याधीला कारणीभूत ठरू नये, अशी अपेक्षा वाकचौरे यांनी व्यक्त केली.
ऑनलाइनच्या नावाखाली शिकवणी व अध्यापन म्हणजे पालकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे. हे तात्पुरते चांगले असले, तरी त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियातून होणारे अध्यापन व शिकवणी बंद करावी, अशी मागणी वाकचौरे यांनी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.