Sharad Pawar : वातावरण ‘मविआ’ला अनुकूल; राज्यात ५० टक्के जागा जिंकण्याचा दावा - शरद पवार

भाजपचा ४०० पारचा नारा हा अतिशय चुकीचा आहे. लोकसभेच्या सर्व जागा जिंकू, असा त्यांनी दावा केला असता, तर मान्य केले असते, असा मिश्किल टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला.
sharad pawar over lok sabha election mva nilesh lanke vote ahmednagar
sharad pawar over lok sabha election mva nilesh lanke vote ahmednagar Sakal

अहमदनगर : भाजपचा ४०० पारचा नारा हा अतिशय चुकीचा आहे. लोकसभेच्या सर्व जागा जिंकू, असा त्यांनी दावा केला असता, तर मान्य केले असते, असा मिश्किल टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला. महाराष्ट्रात या निवडणुकीत ५० टक्के जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी पवार येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी व पक्षाची भूमिका मांडली. यावेळी उमेदवार नीलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, शिवसेनेचे प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे जयंत वाघ आदी उपस्थित होते.

या निवडणुकीत आमचा पक्ष कमी जागा लढवित असला, तरी त्याची गणितं विधानसभा निवडणुकीशी निगडित आहेत. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर आमचा भर असेल. महाविकास आघाडीत एखादी दुसरी जागा वगळता कोणतीही कुरबूर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लढताना जशी राज्यांमध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली तशी राज्यांमध्ये इंडिया आघाडी स्थापन केली. अगोदर एकत्र येऊन निवडणुका लढवू लोकांना स्थिर सरकार देऊ आणि नंतरच आपण इतर बाबींचा विचार करू, असा निर्णय घेऊन आम्ही ही आघाडी स्थापन केली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

घोटाळ्याचा आरोप नेमका कोणावर

सिंचन घोटाळा व राज्य सहकारी बँक घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर आरोप केला होता. ज्यांच्यावर त्यांचा रोख होता, त्यांनाच सोबत घेऊन ते फिरत आहेत. आता त्यांनी तो आरोप नेमका कोणावर केला, याबाबत खुलासा करावा, असे प्रतिआव्हान शरद पवार यांनी दिले.

सत्तेचा वापर कशा पद्धतीने केला हे आता कोणाला सांगायची गरज राहिलेली नाही, भाजपने ईडी, सीबीआयसारखी यंत्रणा वापरली त्यातून अनेक कारनामे पुढे आले. याच ईडीने दोन राज्यांचे मुख्यमंत्री तुरुंगात घातले.

तो उद्योजक कोण?

शुक्रवारी शहरात झालेल्या सभेत शरद पवार यांनी नीलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, असा निरोप घेऊन एका उद्योगपतीला माझ्याकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पाठविले होते, असा गौप्यस्फोट केला होता. पत्रकार परिषदेत पवार यांना विचारले असता त्यांनी हा उद्योगपती नगरच्या बाहेर असल्याचे सांगत त्याचे नाव सांगण्याचे टाळले.

मी काय केले, हे जगाला माहिती

दहा वर्षांत मी काय केले, याबाबत भाजपवाले मला प्रश्न विचारीत आहेत. त्या काळात तुम्ही सत्तेवर होतात. त्याबाबत तुम्हीच उत्तर दिले पाहिजे. मी कृषिमंत्री होतो तेव्हा देशाने काय प्रगती केली हे जगाला माहिती आहे, अशी टीका पवार यांनी शहा यांच्यावर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com