शिर्डी ः देश पातळीवर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कुणी करावे याबाबतचा सध्या सुरू असलेला वाद समजा मिटला तरी मतमतांतरे सुरूच रहातील. परंतु याच काँग्रेससाठी अनेकांनी आपली आयुष्य वेचली आहेत.
पक्षासाठी झटणाऱ्यांमध्ये सर्वसामान्यांपासून ते साधूंपर्यंत सर्वच होते. नगर जिल्ह्यात कोणे एकेकाळी भगवी वस्त्रे परिधान करून व हातात कमंडलू घेऊन फिरणा-या स्वामी सहजानंद भारती या उच्चविद्याविभुषित संन्याशाने या पक्षाच्या वाढीसाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या अध्यात्मिक प्रभावाने भारावलेल्या लोकांनी श्रीरामपूर तालुक्यात नाऊर येथे गोदातिरी त्यांचे समाधी मंदिर उभे केले. एखाद्या राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचे मंदिर उभारले जाण्याची ही देशातील एकमेव घटना असावी.
काँग्रेस पक्षाच्या सुवर्णकाळाचा हा इतिहास आता या पक्षातील नवी पिढी विसरून गेली आहे. देशात राजकीय पक्षांना यश मिळवायचे असेल तर त्यांनी येथील हजारो वर्षापासून चालत आलेल्या आस्था आणि चांगल्या परंपरांचा आदर करायला हवा. घराणेशाही व भ्रष्टाचारपासून दूर रहायला हवे. राजकारणाला, भक्तीमार्गाची वाट वर्ज्य नाही, याचे भान ठेवायला हवे, असाच संदेश हे मंदीर सर्वच राजकीय पक्षांच्या धुरिणांना देत उभे आहे. स्वामीजींचे भक्तगण त्यांच्या समाधीची उर्जा देणारे स्थान म्हणून पूजा करतात.
हेही वाचा - मौलाना आझादची अंमलबजावणी करा
शेकडो वर्षांपासून समानतेचा आणि माणुसकीचा संदेश देणा-या वारकरी संप्रदायासारख्या विविध परंपरासोबत येथील सामान्य जनतेची नाळ घट्ट जुळली आहे. याच वाटेवरून चालणा-या स्वामीजींनी त्याकाळात काँग्रेसच्या राजकारणासाठी अध्यात्म आणि राजकारण यांची सुरेख सांगड घातली.
काँग्रेस होता साधूंचा पक्ष
हा महात्मा गांधींचा मार्ग होता. त्यापासून सध्याची काँग्रेस भरकटली. त्याकाळी महात्मा गांधी आणि विनोबा भावेंसारखे नेते गीतेवरील प्रवचने आणि प्रार्थनेला सर्वाधिक महत्व देत. एकशे पस्तीस वर्षांचा इतिहास असलेला आणि देशाच्या उभारणीत महत्वाची भुमिका बजावणारा काँग्रेस पक्ष काळाच्या ओघात बदलला. अध्यात्मिक वारसा बाजूला पडला. एकगठ्ठा मतांच्या राजकारणाला महत्व आले. आठ वर्षापूर्वी या पक्षाच्या पराभवाच्या मीमांसा करण्यासाठी नेमलेल्या ए. के. अॅन्टोनी यांच्या समितीने हाच मुद्दा अधोरेखित केला. काँग्रेस बहुसंख्याकापासून दूर जात असल्याचे निरीक्षण नोंदविले. हे लक्षात घेतले तर या मंदिराचे महत्व लक्षात येते.
जिल्हाध्यक्षांचे मंदिर
भारतीय जनमानसातील आस्थेच्या प्रतिकांना समोर ठेऊन राजकारण करणा-या भाजपाचा विस्तार झपाट्याने वाढू लागला. देशात एकगठ्ठा मतांच्या राजकारणाला आलेले महत्व हे त्यामागचे एक कारण होते. मूळ वाटेपासून दूर गेलेल्या सर्वसमावेशक काँग्रेस पक्षाची गाडी उताराला लागली. तिच्यात घराणेशाही, नवे आणि जुने असे अन्य बिघाडदेखील झाले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाऊर येथे उभे असलेले काँग्रेस पक्षाच्या एकेकाळच्या जिल्हाध्यक्षांचे हे मंदिर पक्षाला दिशादर्शक ठरू शकेल.
स्वामींचे होते विविध भाषांवर प्रभुत्त्व
स्वामीजींचे विविध भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी कधीही आपण कुठून आलो ते सांगितले नाही. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे तरूण नेते शंकरराव कोल्हे यांच्या आग्रहावरून स्वामीजी पंडीत नेहरूंना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. खास बाब म्हणून त्यांच्याकडून संजीवनी सहकारी साखर कारखाना उभारणीची परवानगी मिळविली. मग त्याप्रित्यर्थ या भागाला स्वामी सहजानंदनगर असे नाव देण्यात आले.
पुढे त्यांचे समाधी मंदिर उभारण्यात ज्येष्ठ नेते कोल्हे यांनी पुढाकार घेतला. काळाचा महिमा असा की, आज कोल्हे यांचे वारस भारतीय जनता पक्षात आहेत. स्वामींनी आयुष्यात कधीही पैशाला स्पर्श केला नाही. ध्यानधारणा, कीर्तन, प्रवचन, वाचन आणि काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. योगायोग असा की स्वातंत्र्य आंदोलनात ब-याचवेळा कारावास भोगलेल्या स्वामीजींचे पंधरा अॉगस्ट 1971 रोजी निधन झाले. त्यांचे समाधी मंदिर काँग्रेससह इतही पक्षांतील कार्यकर्ते, नेत्यांना त्यागाची परंपरा शिकवत आहे.
संपादन - अशोक निंबाळकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.