नगर : ""शेतकऱ्यांनी तीन लाखांपर्यंत पीककर्ज घेतल्यास दोन टक्के व्याज भरावे लागत होते. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या व्याज परताव्यामुळे हे व्याज लागत होते. परंतु आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने तीन लाखांपर्यंत पीककर्ज शून्य व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन टक्के भरावयाचे व्याज जिल्हा बॅंक स्वनिधीतून भरणार आहे,'' अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी आज दिली.
जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपाध्यक्ष रामदास वाघ, ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गायकर म्हणाले, ""शेतकऱ्यांकडून पीककर्जाची बॅंकेकडे वारंवार मागणी होत आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे बॅंक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करू शकत नव्हती. यंदा हवामान खात्याने दमदार पावसाचे भाकीत केले आहे. दुसरीकडे कोरोना संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे कर्जपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा बॅंकेने घेतला आहे.
हेही वाचा ः जिल्हा परिषदेत परस्पर भरती...तीन जणांना नोटिसा
बॅंकेने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. संयुक्त उतारा असलेले शेतकरी सभासद, पीककर्ज सोडून मध्यम व दीर्घ मुदतीचे इतर बॅंकांकडून कर्ज घेणारे कर्जदार शेतकरी सभासद, कर्जमुक्ती योजनेत पात्र असलेल्या मात्र शासनाकडून कर्जमाफीची रक्कम प्राप्त न झालेल्या शेतकरी सभासदांसाठी पीककर्ज पुरवठा करण्याचा निर्णय यापूर्वीच जिल्हा बॅंकेने घेतलेला आहे.''
अवश्य वाचा ः जामखेडच्या सभापती निवडीचा पुन्हा पेच
पीककर्जाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होणार
गायकर म्हणाले, ""जिल्हा बॅंकेने खरीप हंगामात एक लाख 70 हजार शेतकऱ्यांना 1001 कोटींचे पीककर्जवाटप केले. खरीप हंगामासाठी 1498, तर रब्बी हंगामासाठी 809 कोटींचे असे एकूण रुपये 2307 कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. हे उद्दिष्ट बॅंक वेळेत पूर्ण करणार आहे.''
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.