साखरखेर्डा (बुलडाणा) : अवकाळी पाऊस व जोरदार गारपिटीमुळे साखरखेर्डा परिसरातील शेंदूर्जन मंडळातील २०९ शेतकऱ्यांच्या सुमारे १५८ हेक्टर क्षेत्रातील रब्बीची पिके बाधित झाली असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
परिसरातील शेंदूर्जन मंडळातील पांग्री काटे, लिंगा व शिवणी कंकाळ या शिवारात रात्री जोरदार वार्यासह वादळी पाऊस व मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यामुळे या तीनही गावातील हाती आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाची माहिती मिळताच कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामसेवक यांच्या चमूने शेतकर्यांना सोबत घेऊन बाधित भागातील नुकसानीची पाहणी करून अहवाल तयार केला.
पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार जि.प.चे माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख यांनीही कृषी विभाग व महसूल विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन बाधित भागातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर पांग्री काटे येथे कृषी सहायक संतोष चेके, तलाठी आनंद राजपूत, ग्रामसेवक खिल्लारे, सरपंच शिवानंद थिगळे, दिलीप थिगळे, सत्यजित थिगळे, मदन गवई, मनोहर पाटोळे, बालाजी काटे सह अनेक शेतकरी होते. तर लिंगा व शिवणी कंकाळ येथे कृषी सहाय्यक पी.डी.सानप, तलाठी आर.पी.गुंजकर, ग्रामसेवक खिल्लारे सह स्थानिक अनेक शेतकरी होते. अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे या तीनही गावातील गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, मका, रब्बी सोयाबीन, रब्बी मूग, करडई, सूर्यफूल आदी रब्बी पिके व मिरची, वांगी ही भाजीपाला पिके बरोबरच पपई, चिकू, आंबा ही फळपीके जमीनदोस्त झाली.
यामध्ये सर्वांत जास्त कांदा पिकाचे ९८ हेक्टर मोठे नुकसान झाले. त्याखालोखाल हरभरा-26 हे, ज्वारी-10 हे., मका-7 हे. असे नुकसान झाले आहे. पांग्री काटे शिवारातील 122 शेतकऱ्यांचे 92.20 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून लिंगा येथील 44 शेतकर्यांचे 35 हेक्टर व शिवणी कंकाळ शिवारातील 43 शेतकऱ्यांचे 31 हे. क्षेत्र नुकसान ग्रस्त झाले आहे. मिरची, वांगी ही भाजीपाला पिके पपई, आंबा, चिकू ही फळपीके व सोयाबीन, मूग, सूर्यफूल ही रब्बी पिकेही थोड्याफार प्रमाणात बाधित झाली आहेत.
जोरदार उत्पादन हाती येणार असणार्या या पिकांवर अस्मानी संकट कोसळल्याने हाती आलेली पिके नामशेष झाली. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी पीडित शेतकर्यांकडून केली आहे. या सर्व्हेक्षणात दिलीप थिगळे, अंबादास काटे, लिंबाजी थिगळे, श्रीहरी थिगळे, विजय थिगळे, ज्ञानेश्वर काटे, सुदाम थिगळे, ज्ञानेश्वर थिगळे, गजानन मानतकर, मधुकर गवई, नंदकिशोर काटे, शेषराव जाधव, शालीग्राम पाटोळे आदी शेतकर्यांनी सहभाग घेतला.
पोस्ट हार्वेस्टिंग नुकसानी संदर्भात पीक विमा काढलेल्या शेतकर्यांनी ७२ तासांच्या आत ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक गावातील कृषी फलकावर जनजागृती साठी संदेश दिला आहे. सर्व शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपनी यांनीही आपल्या ग्रुपवर संदेश द्यावा व जनजागृती करावी.
- वसंतराव राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.