Akola : बदलत्या हवामानामुळे संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती

दर मिळत नसल्याने सणासुदीला शेतकऱ्यांची झोळी रिकामीच राहिली आहे
akola
akolasakal

बोर्डी : गत वर्षी वातावरणातील बदलामुळे संत्रा पिकाचा आंबिया बहार होता. मात्र, यंदा पावसामुळे सतत ओलावा आणि वातावरणातील बदलामुळे आंबिया बाराला गळती लागली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे, त्यात वरून व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. संत्रा पिकाला भाव चांगला नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन सणासुदिच्या दिवसात नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांची झोळी रिकामीच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी असालेल्या अकोट तालुक्यातील बराचसा भाग हा फळपीक आणि चांगल्या उत्पादन क्षम मालासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गत काही वर्षांपासून संत्रा उत्पादक शेतकरी कधी अवकाळी, गारपीट तर, कधी व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीला बळी पडतो. एकीकडे शासनामार्फत कोरोनासाठी रोग प्रतिकाराक शक्ती वाढावी यासाठी संत्र हे फळ चांगले असल्याचे सांगीतले जात आहे. मात्र, त्या मालाची विक्री करण्यासाठी यंत्रणा मात्र, सतर्क होताना दिसत नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

akola
विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पुलांवरून अवजड वाहतूक अखेर बंद

सुरुवातीला चारशे ते पाचशे रुपये प्रति २० किलो कॅरेटची मागणी होती. मात्र, गत काही दिवसांपासून दीडशे ते दोनशे रुपयांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच मुस्कटदाबी होताना दिसत आहे. अकोट तालुक्यात बोर्डी सह रामापूर, शिवपूर, राहणापूर, कासोद- शिवपूर, उमरा- सुकळी, अकोलखेड, पिंप्री, वस्तापूर, पोपटखेड, आंबोळा हा सातपुड्याचा भाग फळबागेसाठी चांगला आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेती ही संत्रा, लिंबू आणि केळीमध्ये व्यापली आहे. या भागातील संत्रा उत्पादक शेतकरी गत काही वर्षांपासून सातत्याने या- ना- त्या कारणाने अडचणीत येत आहे.

कधी पाणी कमी झाल्याने तर, कधी जास्त झाल्याने कोंडीत सापडला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंबिया आणि मृग असा, दोन्ही प्रकारच्या बहार आहे. त्यापासून मुबलक प्रमाणात पैसे मिळण्याची अपेक्षा शेतकरी करीत होते. मात्र, हवामानातील बदल आणि व्यापाऱ्यांची अडवणूक यामुळे संत्रा उत्पादक चांगलाच भरडून निघत आहे. चांगले पीक आणि मुबलक दाम अशी, अपेक्षा धरून बसलेल्या शेतकऱ्यांना आस्मानी सह सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यंदा सुरुवातीला कमी पावसामुळे हुकमी संत्रा पिकाचा मृग बहार फुटला नाही. त्यामुळे परिसरातील ९९ बागा खाली आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बागेत आंबिया बहाराचे संत्रे आहेत त्यांचे हाल होत आहेत.

akola
अकोला: ११व्या दिवशी मिळाला नदीत वाहून गेलेल्या दर्शनचा मृतदेह

माझ्या संत्रा बागेत सध्या आंबिया बहार तोडणीच्या तयारीत आहे. मात्र, गत काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे आंबिया बाराला गळती सुरू असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. संत्र्याची गळती नेमकी कशामुळे होत आहे? हे अजून शेतकऱ्यांना समजले नाही.

-अमोल ताडे, स्थानिक संत्रा उत्पादक.

अकोट तालुक्यातील काहीच भागात ओलीताची शेती आहे. त्यामुळे ठोक पीक म्हणून संत्र्याची लागवड केली. मात्र, गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्रा पिकाचा मृग आणि आंबिया हे दोन्ही बहार अडचणीचे ठरत आहेत. शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे आणि संबंधित विभागाने लक्ष देवुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.

-शिरीष महल्ले, शेतकरी, शिवपूर.

संत्रा लागवडीकरिता प्रोत्साहन देत असतानाच संत्रा विक्री व संत्रा प्रक्रिया उद्योगाकरिता शासनाकडून कुठलीही यंत्रणा अथवा प्रोत्साहन दिले नाही. तसेच, बरेच वर्षांपासून संत्रा पिकात होणाऱ्या फळगळीकरिता एनआरसीसी किंवा संबंधित विभागाकडून कुठलीही ठोस उपाययोजना सूचवले नाहीत. त्यामुळे संत्रा उत्पादकांची कोंडी होते आहे.

-अमित मानकर, कार्यकारी संचालक, सीटराना फार्मर प्रो. कंपनी, अकोट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com