अकोला : सरकारने वारकऱ्यांना शंभर भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गत सात दिवसांपासून गणेश महाराज शेटे यांचे नियमित तर इतर वारकऱ्यांचे साखळी पद्धतीने आमरण उपोषण सुरू आहे. सदर उपोषण सोडवण्यासाठी मंगळवारी (ता. ८) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासोबत वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. सदर बोलणी दरम्यान तोडगा न निघाल्याने वारकऱ्यांनी त्यांचे आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आंदोलनाअंतर्गत बुधवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य भजन कीर्तन करण्यात येईल, त्यामध्ये विदर्भातील वारकरी सहभागी होतील, अशी माहिती उपोषणकर्ते गणेश महाराज शेटे यांनी बोलणीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्याअंतर्गत माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, राम गव्हाणकर यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. दरम्यान दोन डिसेंबरपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला राजकीय पक्षांचा पाठिंबा स्वीकारला जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु राजकीय पाठबळ न घेतल्यामुळे सरकार वारकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, हे दिसून आले आहे. त्यामुळेच काही संत मंडळींच्या आग्रहास्तव सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी बुधवारी (ता. ९) होणाऱ्या आंदोलनात कार्यकर्त्यांसह वारकरी पोशाखात सहभागी व्हावे आणि वारकऱ्यांच्या लढ्याला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
(संपादन - विवेक मेतकर) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.