फवारणीतून विषबाधेचे सत्र सुरूच; आतापर्यंत 126 जणांना विषबाधा

Akola News: Spray poisoning season continues; So far 126 people have been poisoned
Akola News: Spray poisoning season continues; So far 126 people have been poisoned

अकाेला  ः पिकांच्या मशागतीला वेग आलेला असतानाच कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याचे सत्र जिल्ह्यात सुरू झाले आहे. फवारणीमुळे आतापर्यंत १२६ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली असून एकाचा बळी सुद्धा गेला आहे. त्यामुळे आधीच अतिवृष्टी व नापिकीने हताश झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आता विषबाधेचा धोका अधिक गडद झाल्याचे दिसून येत आहे.

सन् २०१८ मध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शेतमजूर तसेच शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली हाेती. त्यावेळी यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीचे सर्वात जास्त बळी गेले हाेते. अकाेला जिल्ह्यात सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे ११ शेतमजूर व शेतकऱ्यांचा मृत्यू झाला हाेता.

त्यामुळे विषबाधा प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठित केले हाेते. सदर घटनेनंतर यावर्षी सुद्धा कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधेच्या घटना समोर येत आहेत. यावर्षी बाळापूर तालुक्यातील बटवाडी बु. येथील रामदास पांडुरंग सोळंके (वय ४७) यांचा सुद्धा फवारणीतून विषबाधा झाल्याने बळी गेला.

याव्यतिरीक्त अकोला जिल्ह्यासह जवळपासच्या परिसरातील १२६ शेतकरी व शेतमजुरांना आतापर्यंत फवारणीतून विषबाधा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. संबंधितांवर सर्वोपचार रुग्णालयात वेळीच उपचार झाल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. असे असले तरी आता पिकांच्या मशागतीसह फवारणीचे प्रकार वाढत असल्याने पुढील काळात शेतकऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

जहाल कीटकनाशकांची विक्री
सन् २०१८ मध्ये कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे शासनाने पाच कीटकनाशकांच्या वितरण, विक्री व वापरावर निर्बंध लावले होते. कीटकनाशक कायदा १९६८ मधील कलम २७ अन्वये सदर कीटकनाशकांवर निर्बंध लावण्यात आले होते. परंतु नंतर मात्र शासनाने प्रतिबंधित कीटकनाशकांवरील बंदी उठवली. त्यामुळे सध्या सदर जहाल कीटकनाशकांची जिल्ह्यात सर्रास विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी व शेतमजुरांच्या भोवती फवारणीचा फास आवळताना दिसत आहे.


प्रशासनाने राबविली होती मोहीम
कीटकनाशकातून विषबाधा होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेत जिल्ह्यात १६ ते २४ ऑगस्टदरम्यान शेतमजुरांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले. त्यासह रथाद्वारे जनजागृती सुद्धा करण्यात आली. परंतु त्यानंतर सुद्धा फवासणीतून विषबाधेच्या होत आहेत.


कीटकनाशकातून विषबाधेच्या आतापर्यंत १२६ घटना समोर आल्या आहेत. येणाऱ्या काळात फवासणीची लगबग वाढण्याची शक्यता असल्याने अशा घटना वाढू शकतात. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांनी काळजी घ्यावी. कृषी विभागाने विषबाधेसंदर्भात व्यापक जनजागृती केली आहे.
- मुरलीधर इंगळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com