अकोला : आरटीई अर्जासाठी आज शेवटची संधी

साडेतीन हजारांवर अर्ज प्राप्त; प्रवेशासाठी १ हजार ९५ जागा आरक्षित

Last chance for RTE application today
Last chance for RTE application todaysakal

अकोला : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षासाठीची आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील १९६ शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली आहे. संबंधित शाळांमधील १ हजार ९९५ जागा आरटीई कोट्‍यासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच पालकांना प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत आरटीईच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील ३ हजार ६१५ पाल्यांच्या पालकांनी अर्ज केले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज आरटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकणार असल्याने आज प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. (RTE application today)

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पालक २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरू शकतात.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

  • नोंदणी केलेल्या शाळा - १९६

  • आरक्षित जागा - १ हजार ९९५

  • आतापर्यंत केलेले अर्ज - ३६१५

चुकीची माहिती भरल्यास अर्ज होणार रद्द

आरटीईसाठी पालकांनी अर्ज भरताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गूगल लोकेश पुन्हा-पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये. बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा. १ कि.मी, १ ते ३ कि.मी आणि ३ कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना किमान १० च शाळा निवडाव्यात. ३ कि.मी पेक्षा शाळा निवडली आणि बालकाला लॉटरी लागली तर शाळेत जाण्या येण्याचा खर्च पालकांना करावा लागेल याची नोंद घ्यावी. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com