आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींच्या लग्नाची मिटली चिंता! हॉटेल, लॉन, जेवणाची सोय करण्यासाठी सामान्य माणसाने घेतला पुढाकार

Murlidhar Raut, a farmer from Balapur taluka, is helping to get girls from a suicidal family married 2.jpg
Murlidhar Raut, a farmer from Balapur taluka, is helping to get girls from a suicidal family married 2.jpg

अकोला : आत्महत्या करणारा शेतकरी निघून जातो, पण पाठीमागे राहिलेल्यांना जर आधार नसेल तर मग तो भावनिक असेल वा आर्थिक तर त्यांचे आयुष्य वादळवाऱ्यात हेलकावणाऱ्या तारूगत होऊन जाते. गेल्या काही दशकांत आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पुढची पिढी म्हणजे लहान व किशोरवयीन मुले-मुली ही भावनिक, आर्थिक, सामाजिक त्रास सहन करतच मोठी होताहेत. मात्र, खरा प्रश्‍न उभा राहतो तो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीच्या लग्नाचा. आत्महत्याग्रस्त कुटुंबाची विस्कटलेली घडी नीट बसविण्याकरीता शासन आपल्या परीने प्रयत्न करीतच असते. मात्र, गरज असते ती समाजातून कुणीतरी पुढाकार घेण्याची.

बाळापूर तालुक्यातील मुरलीधर राऊत यांनी यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावर शेळद फाट्याजवळ त्यांचे ‘मराठा’ हॉटेल आहे. मात्र, त्याचाही किस्सा काही वेगळाच. महामार्गाच्या चौपदरीकरणात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी ५ ऑगस्ट २०१९ ला विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दैव बलवत्तर म्हणून सहाही जण त्यातून वाचले. त्या शेतकऱ्यांमध्ये मुरलीधर राऊतही होते. त्यांनी ही परिस्थिती स्वतः अनुभवलेली आहे.

मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणात गेलेल्या शेतीचा मोबदला त्यांना आता मिळणार आहे. मात्र, त्या मोबदल्यातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील मुलींच्या विवाहासाठी ते समोर आले आहेत. त्यांच्याकडे हॉटेल, लॉन आणि वऱ्हाडींच्या जेवणाची व्यवस्थाही आहे. ही सर्व सुविधा ते पुर्णतः मोफत उपलब्ध करून देणार आहेत.

लॉकडाऊनमध्ये लावून दिली १२ लग्न

लॉकडाऊनमध्ये सर्व जग विवंचनेत असताना मुरलीधर राऊत यांनी त्यांच्या हॉटेलवर तब्बल १२ विवाह सोहळे पार पडले. गावा-शहरापासून दूर असलेल्या ठिकाणी त्यांनी हा नव्याने केलेला प्रयोग परिसरात चर्चेचा ठरत आहे.

आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुले-मुली यांच्यात अजूनही अस्वस्थता आहे, अस्थैर्य आहे, सतत भीतीचं सावटही आहे. त्यातच ते जगत आहेत. त्यांना समाजाकडून, कुटुंबीयांकडून भावनिक आणि आर्थिक आधार मिळाला नाही तर ही मुलेही दु:खाच्या वाटेवरच जातील.जात आहेत आणि जात राहतील. काही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं झालेल्या घटनांना स्वीकारून आपलं आयुष्य पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत, पण त्यासाठी त्यांना अकाली प्रौढ व्हावं लागत आहे. घरची जबाबदारी घ्यावी लागत आहे. शासनही आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. हे सर्व आम्ही शेतकरी आंदोलन करताना अनुभवलं आहे. आता महामार्गाच्या चौपदरीकरणात गेलेल्या जमीनीचा मोबदला मिळणार आहे. त्यातील काही भाग या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी खर्च करणार आहो. परंतु, हा खूप मोठा प्रश्‍न आहे. मला वाटतं, समाजातून आणखी लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा.
- मुरलीधर राऊत, शेळद फाटा, ता.बाळापूर

संपादन -  सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com