नीरा खोऱ्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे निरा नदीवर असलेले वीर धरण पूर्णपणे भरले आहे. धरणातून सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू असून, आज सायंकाळी या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला 55644 क्युसेकचा विसर्ग वाढवून 61488 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली परिसरातील प्रसिद्ध गावदेवी डोंगरचा काही भाग कोसळला आहे. गावदेवी डोंगर, जो हेरिटेज वास्तू म्हणून ओळखला जातो, हा संरक्षक भिंत नसल्यामुळे खाली कोसळला. या घटनेत दोन गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. अंधेरीत गिल्बर्ट हिल नावाने ओळखला जाणारा हा डोंगर ज्वालामुखीच्या बेसॉल्ट दगडाने बनलेला असून, साडेसहा कोटी वर्षांपूर्वी तयार झालेला आहे.
सांगली जिल्ह्यात पूर परिस्थितीच्या ठिकाणी पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे स्टंटबाजी करण्याबाबत बंदी आदेश लागू. करण्यात आलेले आहेत.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very heavy Rainfall at isolated places) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील शाळा २६ व २७ जुलै २०२४ अशी २ दिवस बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दि. २६ व २७ जुलै २०२४ अशी २ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करावी याबाबत चर्चा केली होती.
कल्याण डोंबिवलीतील शाळा उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळांना सुट्टी जाहीर केलीय. त्यामुळे 1 ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत.
कोयना धरणात २५ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ८ वा.एकूण ७९.४० टीएमसी ७५.४३ % पाणीसाठा झाला आहे. तर सद्यस्थितीत सांडव्यावरून २०००० क्यूसेक्स विसर्ग सुरु आहे.
ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
मिठी नदीची धोक्याची पातळी टळल्याची महत्वाची बातमी समोर येत आहे.मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्याने धोक्याची पातळी टळली आहे.
मंत्रालयात पत्रकार कक्षाच्या छताचा काही भाग कोसळल्याचं वृत्त आहे. हा प्रत्यक्ष छताचा भाग नसून छताला लागून करण्यात आलेल्या पीओपीचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही.
सातारा : भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहिर केली आहे.
अलिबागजवळील समुद्रात जेएसडब्ल्यु कंपनीचं बार्ज भरकटल्याचं वृत्त आहे. कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस हे बार्ज सध्या उभे आहे. इंजिन बंद पडल्यानं बार्ज भरकटल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. तहसीलदार विक्रम पाटील हे याची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. बार्जमध्ये 14 खलाशी असल्याची माहिती मिळत असून सर्वजण सुखरूप आहेत.
अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर यांची गोवा इथल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ५५ व्या आणि ५६ व्या आवृत्तीसाठी महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती .
मुंबईत पावसाचा जोर वाढतो आहे. सीएसटीवरून कल्याण, डोंबिवली, कसारा, कर्जत दिशेने जाणाऱ्या ६० लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या याचा तपशील रेल्वेने दिलेला नाही. मात्र यामुळे चाकरमान्यांचे आता हाल होणार आहेत.
पुण्यातील खेड बिदरवाईच्या इमारतीच्या टेरेसवर ७ जण अडकले आहेत. त्यांना तिथून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मुसळधार पाऊस, पाणीसाठ्यात मोठी वाढ. सध्या विहार, तुळशी, तानसा आणि मोडकसागर हे चार जलाशय भरून वाहत आहेत. सोमवार, २९ जुलै २०२४ पासून मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील १०% पाणीकपात मागे घेतली जाणार
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटायला आलेल्या शिवरतन मुंडे नावाच्या शेतकऱ्याला मदत केली. त्यांच्या वडिलांचा काही काळापूर्वी आत्महत्या करून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या कार्यालयाला मुख्यमंत्री मदत निधीतून ५ लाख रुपयांचा धनादेश देण्याची सूचना केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनाच्या दोन महत्त्वाच्या सभागृहांचे - 'दरबार हॉल' आणि 'अशोका हॉल' यांचे अनुक्रमे 'गणतंत्र मंडप' आणि 'अशोका मंडप' असे नामकरण केले: राष्ट्रपती भवन
पुणे जिल्ह्यातील पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिका आपत्कालीन विभागांमध्ये अजित पवार यांनी हजेरी लावलेली आहे
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून पुणे शहरातली तसेच पुणे जिल्ह्याची माहिती घेऊन काय उपाययोजना केली जाईल यावर अजित पवार यांनी चर्चा केलेली आहे
मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे लोकांना नक्कीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या पावसात लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई, ठाणे शहर, भिवंडी आणि बाह्य शहर विभागातील ग्रामपंचायतींमध्ये महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्या शहरांतील 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला आहे.
संसद कार्यालयात राज्यसभेतील आणि लोकसभेतील खासदारांसोबत पंतप्रधान मोदी आज संवाद साधणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील भाजप खासदारांना पंतप्रधानांकडून खास निमंत्रण देण्यात आले आहे.
सध्या पुण्यात मुसळधार पाऊस पडत असून, या पावसाचा फटका मुक्या जनावरांना ही बसला आहे. पुण्यातील वारजे स्मशानभूमी येथे एका गुरांच्या गोठ्यामध्ये १३ जनावरे पाणी आल्याने मृत्युमुखी पडली आहेत.
पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याकडून पुढील 24 तासांसाठी नवा अंदाज जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील धानोरी परिसरातील घराघरांमध्ये पाणी शिरले आहे. पुण्यातील धानोरी परिसराला मुसळधार पावसाचा फटका बसला असून, अनेक ठिकाणी घराघरांमध्ये पाणी शिरले आहे.
१ तारखेपासून राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मी दौऱ्यात काही लोकांना भेटेन... निवडणुकीच्या तयारीला लागा, २२५ जागा आपण लढवणार आहोत.
प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दि२४/०७/२०२४ रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, जगह पाली या तालुक्यांमध्ये रात्रीपासून अतिवृष्टी झाल्याने व समुद्रास असलेल्या भरतीमुळे कुंडलिकर, अंबा व सावित्री या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी भरले आहे.
पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.
पुणे महानगर पालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटी मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात पुणे सातारा कोलहापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे.
वाहतूक पोलिसांकडून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी तिसऱ्यांदा बंद करण्यात आला आहे. शेजारील मोगरा नाल्यातील पाणीदेखील अंधेरी सबवेत शिरले असून, परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.
रजपूत वीट भट्टी, एरंडवणा गावठाण याठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले असून, तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. राजकीय पक्षाच्या वतीने चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान सुतारदरा, आनंदनगर मेट्रो स्थानक, कोथरूड कचरा डेपो येथेही पाणी साठले होते, मात्र नंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
पुण्यासह परिसरात गेल्या 24 तसांत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये अनेक भागांना फटका बसला आहे. अशात उरुळी देवाची परिसरातील वडकीपाशी जुन्या पालखी मार्गावर दीड ते दोन फूट पाणी साठून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.
सांगली विभागातील पलूस आगाराच्या आमनापूर ते अंकलखोपमध्ये असणाऱ्या कृष्णा नदीच्या पुलाजवळ पाणी आल्याने सदर मार्गे जाणारी वाहतूक बंद केली आहे. यासाठी पलूस-इस्लामपूर असा पर्यायी मार्ग आहे. दरम्यान पलूस-सांगली मार्गे वाहतूक सुरू आहे.
शिराळा आगारातील आरळा- शित्तूर पुलावर पाणी आल्याने कांडवन गावात जाणाऱ्या फेऱ्या मणदूर सोडण्यात येत आहेत. तर शिराळा तालुक्यातील इतर ठिकाणची वाहतूक सुरळीत चालू आहे.
कोल्हापूरात प्रचंड पावसामुळे राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. अशात जिल्ह्यातील अनेक भागांत पुरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दुपारी एक वाजता बैठक बोलावली आहे.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले असून, आज सकाळी 10.05 वाजता धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे.
पावसाचा जोर राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून 2928 क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणाचे दरवाजे आज (गुरुवारी) दुपारी दीड फुटांनी उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवणार आहे.
धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणावर आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरु आहे. परिसरात अजून दोन दिवस मुसळधारचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे महानगर पालिकेच्या समोर असलेल्या टिळक पूल पाण्याखाली गेला असून तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे धरण जलाशय सकाळी ७ वा. ७० टक्के क्षमतेने भरलेले होते. आज दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.
पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे माझे आवाहन आहे.
इंद्रायणी नदीवरील मोई गावाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुण्यात पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे. पुणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. शहरातील सिंहगड रोडवरील घरे, सोसायटी पाण्याखाली गेल्या आहेत. लोकांना कंबरेइतक्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे.
पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज संध्याकाळी ४:०० वा. धरणाची वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उचलून सांडव्यावरून १०००० क्युसेक्स विसर्ग सुरू करणेत येणार असून येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल.
कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
निपाणी : निपाणी शहर व परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्याचबरोबर राधानगरी परिसरात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच काळम्मावाडी धरणातून पाणी सोडले जाणार असून यामुळे दूधगंगा नदीची पाणी पातळी येत्या २४ तासात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील जनतेने सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार एम. एन. बळीगार यांनी केले.
रायगड मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. घाट साधारण ४-५ तास बंद राहिल असा अंदाज आहे.
मुंबईत आणि उपनगरात पावसाची संततधार सुरुच आहे. याचा परिणाम लोकल रेल्वे सेवेवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिन्ही मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.