सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जिल्ह्यात काँग्रेस यापुढे स्वबळावरच निवडणुका लढवणार आहे. गेल्या काही वर्षांत पक्षाला आलेली मरगळ झटकत नव्या जोमाने काँग्रेसला जिल्ह्यात बळकटी देण्यात येणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस राजन भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्तेपदी दिलीप नार्वेकर व इर्शाद शेख यांची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांची निवड झाल्यानंतर प्रथमच कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा प्रभारी आमदार सुभाष चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, माजी नगराध्यक्ष नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, दादा परब, इर्शाद शेख, राघवेंद्र नार्वेकर, आशा कंठक, कौस्तुभ गावडे उपस्थित होते.
श्री भोसले म्हणाले, ""जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी चांगल्या प्रकारे संघटना बांधणी केली होती; मात्र हवे तसे यश मिळाले नाही. आज आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे येणाऱ्या दोन वर्षांत जिल्ह्यात कॉंग्रेसला उभारी देण्यासाठी नव्याने जिल्हाध्यक्षपद श्री. गावडे यांना सर्वानुमते देण्यात आले. सत्तेतील मित्रपक्षांशी समन्वय साधून ताकदीवर पक्ष उभा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदमध्ये सत्ता येण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.''
ते म्हणाले, ""आज राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची सत्ता असली तरी जिल्ह्यातील निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढवणार आहेत. नव्या जिल्हाध्यक्षांना मुंबईत बोलावून रणनीती आखून देण्यात येणार आहे. वाढती महागाई, गॅस सिलिंडर, पेट्रोल दराचा भडका अशा जनहितांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात येणार आहे. भाजपकडून सरकारवर स्थगिती सरकार असा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षात फडणवीस सरकारने राबवलेल्या चुकीच्या व खोट्या योजनांना कात्री लावली आहे. त्यामुळे त्यांचे आरोप चुकीचे आहेत. निधी लवकरच उपलब्ध थांबलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यात येतील.''
ते म्हणाले, ""माजी जिल्हाध्यक्ष सावंत यांच्याकडून काका कुडाळकर यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द केली होती; मात्र काही कारणास्तव त्याला स्थगिती दिली आहे. येथील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत कॉंग्रेसमध्ये दुफळी नव्हती. आताही सर्वजण एकत्रितपणे पक्ष उभारणीसाठी काम करणार आहेत. त्यासाठी लवकरच समन्वयक समिती गठीत करण्यात येणार असून श्री. सावंत यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.''
नारायण राणे कॉंग्रेसमध्ये असताना जिल्ह्यात "हात' चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आजही राणे यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर कारवाईबाबत पक्षाकडून काहीच होत नसल्याबाबत श्री. भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, ""त्यांनी स्थापन केलेल्या गटामुळे तांत्रिक अडचणी येते. त्यामुळेच त्यांना अभय मिळाले असले तरी आजही आम्ही कारवाईसाठी प्रयत्नशील आहोत.''
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.