सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा कालावधीत जिल्ह्याला राज्य शासनाकडून वाढीव निधी देणे आवश्यक होते; मात्र तसे न करता राज्य सरकार जिल्ह्याला प्राप्त निधी मागे घेत आहे. कमी निधीमध्ये विकास कसा होणार, असे सांगत हे सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करावा आणि कोरोना कालावधीत गावपातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना तातडीने निधी द्यावा, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे भेट घेत चर्चा केली. यावेळी आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, राजेंद्र म्हापसेकर, सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, प्रमोद जठार, अतुल काळसेकर आदी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ""जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ते सर्व मुंबईतील आहेत. आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करायला कमी पडत आहे. कोरोनावर उपचार करायला हवे तसे उपचार जिल्हा रुग्णालयात केले जात नाहीत. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांचे हाल होत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करत आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. शासनाने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शासनाकडे करणार आहे.''
हे पण वाचा - Video : पैसा मोठा की निसर्ग.... जाणून घ्या कोकणच्या पर्यावरणाविषयी.. -
निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे त्वरित व्हावा, गावपातळीवर कोरोना पार्श्वभूमीवर कार्यरत असलेल्या सरपंचांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे त्यांनी सांगितले.
अवघ्या 14 कोटीत विकास होणार कसा ?
2019-20 ची चांदा ते बांदा योजना आणि 2020-21 च्या बजेटबाबत चर्चा केली असत चांदा ते बांदा योजनेचे तब्बल 92 कोटी रूपये शासनाला परत केल्याचे तसेच 2020-21 च्या 144 कोटी बजेटमध्ये कपात करून केवळ 44 कोटी निधी मंजूर केला आहे. त्यापैकी केवळ 14 कोटी रूपये शासनाने जिल्ह्याला दिले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली; मात्र 14 कोटीच्या निधीमध्ये जिल्ह्याचा विकास कसा होणार असा प्रश्नही श्री. राणे यांनी उपस्थित केला.
जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करावीच लागेल
जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णाचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह मग निगेटिव्ह येतो. रुग्णांची होत असलेली हेळसांड आदी बाबींचा आमदार नितेश राणे यांनी पर्दाफाश केला आहे. याला जबाबदार असणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रुग्णांबाबत बेफीकीर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल. तसे करण्यास भाग पाडू, असा इशाराही राणे यांनी दिला.
हे पण वाचा - वाचावे ते नवलच...! पुरुषांनी केली वटपौर्णिमा साजरी -
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.