राजापूर - गावच्या सर्वांगीण विकासामध्ये लोकसहभाग, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या योगदानाचा सुंदर मिलाफ करताना गावची नागरी स्वच्छता, यशस्वी ग्रामसभा आणि विविध वैयक्तिक व शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या तालुक्यातील धाऊलवल्ली ग्रामपंचायतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज सक्षमीकरण व तानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामगौरव पुरस्कार या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारावर यशाची मोहोर उमटविली आहे. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या राज्यातील केवळ चार ग्रामपंचायतींमध्ये धाऊलवल्लीचा समावेश आहे.
या मानाच्या पुरस्काराचे वितरण २३ ऑक्टोबरला दिल्ली येथे होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेली धाऊलवल्ली ग्रामपंचायत आंबेलकरवाडी, कोकरेवाडी, धाऊलवल्ली, भाबलेवाडी व दसुरीवाडी अशी पाच महसुली गावे मिळून तयार झाली आहेत.
पंचायतराज व्यवस्थेसाठी शेवटचा घटक असलेल्या गावचा विकास करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असतो. त्याचे महत्व ओळखून सरपंच मनोहर गुरव आणि सहकाऱ्यांनी गावविकासाचे नियोजन केले. त्याची प्रशासनाने योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली. त्याला लोकांनी साथ देवून धाऊलवल्ली गावामध्ये विकासात्मक परिवर्तन घडविण्यात आले आहे. १०० टक्के हागणदारीमुक्त गाव, दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट, लोकसहभागातून स्वच्छता अभियान, ग्रामसभांना उपस्थित राहून गावच्या विकासात लोकसहभाग आदी विविध लक्षवेधी उपक्रम ग्रामपंचायतीने राबविले.
फळबाग लागवडीतून रोजगारनिर्मिती
धाऊलवल्ली ग्रामपंचायतीमध्ये फळबाग लागवडीसह विविध योजना राबविण्यात आल्या. त्यातून वर्षभरामध्ये सुमारे पाच हजार मनुष्यदिन निर्मिती होऊन लोकांना रोजगार मिळाला. अकुशल कामगारांवर सुमारे १० लाख ६ हजार, तर कुशल कामगारांवर ४९ हजार असे मिळून १० लाख ५५ हजार रुपयांचे अनुदान खर्च झाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.