दोडामार्ग - आश्वासने नकोत, ठोस निर्णय द्या; ठोस निर्णय असेल तरच आंदोलन स्थळी या अन्यथा येऊ नका, असा निर्वाणीचा इशारा दोडामार्ग जनआक्रोश समितीच्या आंदोलनात सहभागी महिलांनी आज दिला. या आंदोलनाचे पडसाद आता जिल्ह्यातही उमटू लागले आहेत.
अनेक नेते, आमदार, खासदार यांनी आंदोलकांची भेट घेतली; पण कुणीही ठोस निर्णय दिला नाही. त्यामुळे गेले आठ दिवस आंदोलन करणाऱ्या महिलांचा संताप अनावर झाला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला क्षोभ व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी हजारो महिला रस्त्यावर उतरण्याची आता वेळ आली आहे.
आरोग्यमंत्री दीपक सावंत सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत; पण आपले असूनही त्यांनी साधी विचारपूस केली नाही. जिल्ह्यातील दोन दीपक (आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि पालकमंत्री दीपक केसरकर) शासनाचे प्रतिनिधित्व करताहेत; पण आमचे भवितव्य मात्र अंधारात आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार. कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत. एकवेळ मोडू; पण गोवा आणि महाराष्ट्र सरकारसमोर झुकणार नाही, असा इशारा महिलांनी दिला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस अशी घोषणा भाजप करते; पण आमचा दोडामार्गचा वाली कोण? असा संतप्त सवालही महिलांनी विचारला.
या ठिकाणी येणारे नेते आमचे सांत्वन करण्यासाठी येतात काय? असे विचारून त्या म्हणाल्या, ठोस निर्णय असेल तरच या, अन्यथा येऊ नका. आमचा आरोग्याचा प्रश्न आमच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे तडजोड नाही आणि माघारही नाही, असे त्या म्हणाल्या.
आंदोलनातील महिलांच्या घरी जाताना काही लोक आमच्या पिशव्या तपासतात; आंदोलनास किती पैसे घेतल्याचे विचारतात, असा गंभीर आरोप महिलांनी केला. जीवनाच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा. मग फूट पाडण्याचा प्रयत्न का, असे सांगून शिवसेनेने काल केलेल्या आंदोलनाशी आमचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महिलांनी दिले. काहीही झाले तरी मागे हटणार नाही; जीव गेला तरी बेहत्तर अशी भावना महिलांनी व्यक्त केली.‘आठ रुपयांचा कडीपत्ता; सरकार आणि आरोग्यमंत्री झाले बेपत्ता’ या महिलांच्या घोषणांनी परिसर दणाणला होता.
या वेळी कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई, साक्षी नाईक, मनीषा नाईक, विजया नाईक, रेश्मा जाधव आदी महिलांसह सर्व जनआक्रोशचे सर्व संयोजक, उपोषणकर्ते आणि शेकडो महिला उपस्थित होत्या.
व्याप्ती वाढली
दरम्यान, या आंदोलनाची व्याप्ती आता वाढली आहे. आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत जनआक्रोशला पाठींबा देणारा ठराव घेण्यात आला. विधानसभेच्या पायरीवर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, राजन साळवी आदींनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी फलक झळकावले.
मुख्य संयोजकांची प्रकृती ढासळली
या आंदोलनाचे मुख्य संयोजक तथा तेरवण मेढे सरपंच प्रवीण
गवस यांची प्रकृती ढासळली. त्यांना सायंकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्री. गवस या आंदोलनाच्या नियोजनासाठी व नंतर आंदोलनामध्ये मिळून गेले २३ दिवस फिरत होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.