सध्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत गुवाहाटी येथे जवळपास ५० आमदार हे बंडात सामील झालेले आहेत. शिवसेनेने गोड बोलून प्रसंगी सज्जड दम देऊन या आमदारांना परत आणण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी झालेला नाही. या बंडाला भारतीय जनता पक्षाची फूस असल्याचं देखील सांगितलं जात आहे. उद्या होणाऱ्या अविश्वास ठरावात उद्धव ठाकरे सरकारचं भविष्य ठरणार आहे.
बंडखोरांचा आक्षेप आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुळे उद्धव ठाकरे सरकार हे बाळासाहेबांच्या हिंदुत्वापासून दूर गेले आहेत. निधी वाटपाच्या बाबतीतही शिवसेना आमदारांवर अन्याय केला जातो अशी बंडखोरांची भावना आहे आणि म्हणूनच पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. शिवसैनिकांची नाराजी ही पहिल्यांदाच घडली आहे असं नाही. यापूर्वी देखील अनेकदा शिवसेना फुटली होती आणि कित्येकदा पक्ष कार्यकर्ते नाराज झाले होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशी परिस्थिती अत्यंत कुशलतेने हाताळली होती. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये बाळासाहेबांना याच संदर्भात प्रश्न विचारले होते. बाळासाहेबांनी त्याची उत्तरे काय दिली होती हे पाहणे महत्वाचं आहे.
संजय राऊतांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला होता, तुम्हाला संघटनेत सत्तेसाठी सुरू असलेली धुसफूस जाणवते का? बाळासाहेब ठाकरे यावर उत्तर देताना म्हणाले, धुसफूस अजिबात नाही. एखाददुसऱ्या इकडेतिकडे दोन-तीन व्यक्ती असू शकतात. पूर्ण संघटनेत नाही. आणि त्या मूर्खाना हेही कळत नाही की आज आपण हे बोललो त्याचे परिणाम काय झाले असतील? रामशास्त्री बाण्याच्या अविर्भावात कोणीतरी बोलून जातं पण त्यांना कल्पना नाहीय की शिवसैनिकांचं हृदय कसं बांधलं गेलेलं आहे. त्याच्या रक्तात कोणत्या पेशी आहेत ज्या मी टाकलेल्या आहेत. त्या पेशींना किती परवडले तुमचे विचार हासुद्धा त्या बोलणाऱ्याने जरा विरोधी सूर असला तरी त्याचा विचार करावा. माणसं अशी एका सूत जिंकता येत नाहीत.
बाळासाहेब सांगतात मी त्यांच्या मनावर सारखे संस्कार घडवत असतो. मी प्रेमाने माणस जिंकलेली आहेत. एक शिवसैनिक जरी उभा राहिला आणि त्यानं सांगितलं की, बाळासाहेबांमुळे मी शिवसेना सोडली तर मी आता शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देईन, एवढा आत्मविश्वास आहे मला. मी कोणालाही दुखावलं नाही. हां. मी माणसांशी कडवटपणाने बोलतो. चालतो, पण त्यांना माहितेय की बाळासाहेब का चिडलेत ते. पण त्याच्यामागे प्रेम आहे बाळासाहेबांच, हे त्या शिवसैनिकाला माहीत असते. दुसऱ्याने चिडून दाखवा शिवसैनिकांवर, काय परिणाम होतील ते बघा. मी ज्यावेळेला चिडतो त्यावेळेस तो नम्रपणान ऐकतो, आणि त्याला माहीत आहे की बाळासाहेब आपल्याला मार्गदर्शन करताहेत. बाळासाहेब आपल्यावर रागावले चिडले. पण त्या चिडण्याच्या मागेही एक फार मोठे प्रेम आहे. आपला उत्कर्ष व्हाव मल व्हावे या दृष्टीन बाळासाहेब बोलताहेत आपल्याला माझी आयुष्यातली कमाई एवढीच आहे. माझी पैशाची कमाई नसेल, पण ही माझी मोठी कमाई आहे. शिवसैनिकाचं प्रेम माझे त्याच्यावर त्यांचं माझ्यावर यापेक्षा आमच्याकडे दुसरे भांडवल नाही.
सामनाच्या मुलाखतीमध्ये बाळासाहेबांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रवेशाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला होता. संजय राऊत म्हणाले होते, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या झपाट्याने पुढे आलेल्या नेतृत्वामुळे सेनेतील दुसऱ्या फळीत अस्वस्थता दिसत आहे. कारण लोक पूर्णपणे उद्धव व राजच्या मागे जाताना दिसत आहेत.
बाळासाहेब म्हणाले, हे नेतृत्व मी लादलेलं तर नाही ना? मी लादलेलं नाही की तुम्हाला राजला स्वीकारावं लागेल. उद्धवला स्वीकारावंच लागेल, असं मी लादत नाही ना? तुम्ही त्यांच्याकडे जाताय. त्यांना बोलवताय. आणि पोरं अक्षरशः विचारानं, आचारानं, सर्वच दृष्टीन अक्षरश: फार मोठी डेव्हलप झाली आहेत. म्हणजे मुरब्बी होत चालली आहेत. हा मुरब्बीपणा आपल्या मुळावर येईल की काय? अशी जर उद्या कुणाला भीतीच वाटली. तर मी काय करू? बरं हे काय त्यांना निवडणुकीला उभे करून मुख्यमंत्री करण्याचे मार्ग नाहीत माझे, त्यांच्या नशिबात जे आहे ते मलाही काढून घेता येणार नाही किंवा देता येणार नाही.
मी शिवसेनाप्रमुख होणार हे मला तरी कोठे माहीत होत? मी व्यंगचित्रकार. माझ्या मेहनतीनं मी उभा राहिलो. पण मी शिवसेनाप्रमुख झालो. उदया ते कोणी होणार असतील तर त्यांच्या नशिबात असलेलंच होईल. घराणेशाही कोठे सुरू होते? पोरात काही गुण नाही. नालायक कार्ट, बड्या बापाचं कार्ट एवढ्यापुरताच संबंध. तरीपण मी मात्र त्याला मुख्यमंत्री म्हणून लादला, पंतप्रधान म्हणून लादला तर ती घराणेशाही. पण माझं पोरगं कर्तृत्वाच्या जोरावरती पुढं येतय. त्याचा माझ्याशी काही संबंध नाही आणि ते उद्या चमकलंच तर मी का म्हणून सांगू? तो माझा अधिकारच नाही. मी लोकांना फोन करतोय... पत्र लिहितोय.. की माझ्या मुलाला अध्यक्षपद दिलं नाही तर याद राखा... प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं नाही तर याद राखा. बघतो तुम्ही कसे काम करता संघटनेत अशी काय आमची पत्र जाताहेत का त्यांना? कोणीही उठून सांगावं- होय, बाळासाहेब तुम्ही मला त्या दिवशी फोन केला होता. राजला बोलवा, उद्धवला सांगा तमुक करा. एकानं सांगावं येऊन. चला. That's my challange. Open challenge to anybody, even to my leaders, Come on. माझ्या नेत्यांना सांगतोय असा काही प्रकार झाला असेल तर मला सांगा तुम्ही. तुम्ही शिवसेनाप्रमुख व्हा. मी बाजूला होतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.