जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : यंदा आषाढी वारीच्या नियोजनासाठी पहिल्यांदाच ‘बीबीपीपीडीआर’ (ब्रॉडबॅंड पब्लिक प्रोटेक्टर अँड डिझास्टर रिलीफ) प्रणाली वापरली जात आहे. त्यासाठी अंदाजे तीन कोटींचा खर्च अपेक्षित असून, निविदा काढून मोबाईल कंपनीला त्याचे काम दिले जाणार आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरात अंदाजे ३० लाख भाविक पंढरीत येतील, असा अंदाज आहे. त्यांच्या नियोजनासाठी प्रशासकीय यंत्रणेला एकमेकांशी सहजपणे संपर्क साधता येईल, अशी ही प्रणाली आहे.
देशात पहिल्यांदाच ‘बीबीपीपीडीआर’चा वापर पंढरीच्या आषाढी वारीवेळी केला जात आहे. आषाढी वारीवेळी पंढरपूर आणि आजूबाजूच्या पाच-सहा किमी परिसरात लाखो भाविक असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. पंढरपूर शहर व चार-पाच किमी परिसरापर्यंत या प्रणालीद्वारे प्रशासनाला एकमेकांशी समन्वय साधता येणार आहे. सुमारे ५०० ते ५५० मोबाईल या प्रणालीशी जोडले जाणार आहेत.
या प्रणालीसाठी अंदाजे तीन कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी मोबाईल कंपन्यांकडून निविदा मागवून घेतल्या जातील, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ही प्रणाली यशस्वी ठरल्यास नाशिकमधील आगामी कुंभमेळ्यात देखील वापरली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
देशात पहिल्यांदाच या प्रणालीचा वापर
आषाढी वारीवेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे ३० ते ३५ लाख भाविक पंढरपुरात येतात. त्या गर्दीमुळे मोबाईलवर एकमेकांशी संपर्क साधता येत नाही. अशावेळी नियोजनात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच आम्ही ‘बीबीपीपीडीआर’ प्रणाली वापरणार आहोत. वानखेडे स्टेडिअमवर एका क्रिकेट सामन्यावेळी ही प्रणाली वापरली होती. वारीसाठी देशात पहिल्यांदाच आपण ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर वापरत आहोत.
- कार्तिकेयन एस., जिल्हाधिकारी, सोलापूर
अशी आहे ‘बीबीपीपीडीआर’ प्रणाली
राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी आषाढी वारीसाठी पहिल्यांदाच ‘बीबीपीपीडीआर’ या प्रणालीचा वापर करणार आहेत. आपत्ती काळात जेव्हा सामान्य लोकांचे मोबाईल नेटवर्क ठप्प किंवा व्यस्त असते, तेव्हा या प्रणालीद्वारे स्वतंत्र नेटवर्कमुळे बचाव पथकांना एकमेकांशी अखंड संपर्क साधता येतो. पारंपरिक नॅरोबँड नेटवर्कच्या जागी या तंत्रज्ञानाचा वापर करून हाय-डेफिनिशन व्हिडिओ, थेट छायाचित्रे आणि डेटा तत्काळ आपत्कालीन नियंत्रण कक्षापर्यंत पोचवला जातो. त्यातून योग्यवेळी योग्य ठिकाणी उपाययोजना करून संभाव्य आपत्ती टाळता येते.