मुंबई : दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावरही विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हातात असलेल्या फलकावरून आणि आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणावरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत रोष व्यक्त केलाय. 'उद्धवजी काश्मीर मुक्तच्या घोषणा आपण मुंबईत सहन करणार काय?' असा प्रश्न थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. फेसबुक आणि ट्विटरवर एएनआय या वृत्तसंस्थेचा व्हिडिओ शेअर करत फडणवीस यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडले.
ही निदर्शने नेमकी कशासाठी? काश्मीर मुक्त करण्याच्या घोषणा का? अशा विघटनवादी तत्वांना आपण मुंबईत कसे सहन करणार? काश्मीर मुक्त करण्याच्या घोषणा आझादी गॅंगकडून मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या 2 किमी अंतरावर दिल्या जातात. हा संपूर्ण प्रकार उद्धवजी आपण सहन करणार आहात काय? असे थेट प्रश्न करत उद्धव ठाकरे यांना फडणवीसांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
या आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्या काश्मीर मुक्तीच्या फलकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आंदोलनामध्ये आयआयटी बॉम्बे, टाटा इन्स्टीट्यूटसारख्या शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी बॉलिवूडचे अभिनेते, अभिनेत्रीही सहभागी झाल्या होत्या.
तत्पूर्वी, जेएनयूमध्ये रविवारी सायंकाळी मास्कधारक हल्लेखोरांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह 30 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांना गंभीर मारहाण करण्यात आली. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.