सोलापूर - घरात व परिसरातील अस्वच्छतेमुळे राज्यात मलेरियाची साथ आली असून, जानेवारी महिन्यात 302 रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळले आहेत. त्यामध्ये मुंबईतील सर्वाधिक 176, तर गडचिरोली जिल्ह्यातील 85 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया, स्वाइन फ्लू या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मलेरियाच्या रुग्णांची संख्या असून, रायगड चार, नंदुरबार, जळगाव, सातारा, कल्याण, भिवंडी याठिकाणी प्रत्येकी एक, तर वसई-विरार तीन, उल्हासनगर पाच, नागपूर, गोंदिया व पुण्यात प्रत्येकी दोन, कोल्हापूर पाच अशा रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांच्यावर सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये तातडीचे उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात स्वाइन फ्लूच्या 117 रुग्णांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत दरवर्षी मलेरियाचे रुग्ण आढळतात; परंतु आता नववर्षात राज्यभरात 302 रुग्णांना मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध केला असून कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - डॉ. प्रकाश भोई, सहसंचालक, आरोग्य विभाग राज्याची रुग्णांची स्थिती 302 - मलेरिया 148 - डेंगी 35 - चिकुनगुनिया 117 - स्वाइन फ्लू 12 - स्वाइन फ्लूमुळे मृत्यू |