कल्याण - सत्तेतही राहायचे आणि विरोधही करायचा या शिवसेनेच्या भूमिकेवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी कडाडून टीका केली. भाजपच्या भूमिकेला कंटाळून रालोआमधून अनेक पक्ष बाहेर पडले. मात्र शिवसेनेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. शिवसेना ही मोदींना घाबरते का, असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी येथील जाहीर सभेत केला.
कल्याणातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. ते म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य बहुजन समाजाने जागून उठले पाहिजे, आपल्यावर अन्याय होतो आहे; याची जाणीव जर होत असेल तर आपल्याला दोष देण्याऐवजी आपणच आपल्यासाठी लढायला तयार झाले पाहिजे, असे आवाहन असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणात केले.
भारतरत्न पुरस्काराच्या राजकारणावर बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांव्यतिरिक्त कोणत्या दलित नेत्यांना आजपर्यंत भारतरत्न दिले आहे, असा सवाल विचारला. आपल्या आघाडीने वंचितांना संविधाना मार्फत, लोकशाही मार्गाने त्यात सहभागी होत स्वतःला न्याय दिला पाहिजे, असेही ओवेसी म्हणाले. शिवसेनेच्या भूमिकेवर ओवेसी यांनी टीका करत शिवसेना मोदींना घाबरते का, असा सवालही विचारला.
आरएसएस दहशतवादी संघटना
बहुमत नव्हते तोपर्यंत सहकाराची भाषा होती, मात्र बहुमत आल्यावर भाजपने स्वतःचा रंग बाहेर काढायला सुरुवात केल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आरएसएस ही एक दहशतवादी संघटना आहे. डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याकडे शस्त्रे कशासाठी होती? याची खोलवर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.