पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदी वारकऱ्यांऐवजी राजकीय व्यक्तींची निवड केल्याच्या निषेधार्थ आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा येथील सरगम चौकात थांबविण्यात आला. नव्याने नेमलेली समिती बरखास्त करण्याची घोषणा सरकार करत नाही, तोपर्यंत सोहळा पुढे जाणार नसल्याचे फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष माउली महाराज जळगावकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज पंढरपुरात असल्याने त्यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे. आज सायंकाळी सातच्या दरम्यान माउलींच्या पालखी सोहळ्याने पंढरपुरात प्रवेश केला. सोहळा सरगम चौकात आल्यानंतर वारकऱ्यांनी ठिय्या मांडला. टाळमृदंगाचा गजर करत सरकारचा निषेध वारकरी करत होते. पंढरपूरधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांची निवड आज शासनाने जाहीर केली होती. यामध्ये डॉ. अतुल भोसले, रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, दिनेश कदम, सचिन अधटराव, भास्करगिरीबाबा, गहिनीनाथ औसेकर, संभाजी शिंदे यांची निवड जाहीर केली होती. सरकारच्या या निर्णयाने वारकरी पूर्ण निराश झाले होते. आठपैकी सहा लोक राजकीय आहेत. वारकरी संप्रदायाला विश्वासात घेत सदस्यांची निवड होणे अपेक्षित होते. खासकरून अतुल भोसले यांची निवड अध्यक्षपदी झाल्यावर संप्रदायात चीड निर्माण झाली. भोसले हे कऱ्हाडमधील कृष्णा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आहेत. याशिवाय भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहेत. याबाबत माउलींच्या पालखी सोहळ्यातील फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष माउली महाराज जळगावकर यांनी सांगितले, की मंदिर समिती जाहीर करताना दोनच व्यक्ती संप्रदायातील आहेत. समितीतील निम्मे सदस्य वारकरी संप्रदायातील असावेत, अशी मागणी वेळोवेळी केली आहे. तोंडाला पाने पुसण्याच्या दृष्टीने दोन वारकरी लोकांची निवड सरकारने केली. बाकी राजकीय मंडळींचीच नेमणूक केली. वास्तविक हे राजकीय पुनर्वसन केले. मुख्यमंत्र्यांनी नूतन समिती नेमावी. माउलींच्या सोहळ्यातील मानकरी रामभाऊ चोपदार यांनी सांगितले, की शासनाच्या ताब्यात शिर्डी, कोल्हापूर, तुळजापूर देवस्थाने आहेत. तिथे आम्ही वारकरी व्यक्तीची नेमणुकीची मागणी करत नाही. वारकऱ्यांची जी आळंदी, पंढरपूर ही देवस्थाने आहेत, तेथे पन्नास टक्के वारकरीच नेमावेत. वारकऱ्यांनी आतापर्यंत संयमी भूमिका घेतली आहे. |