औरंगाबाद - गवंडी कामासाठी दुचाकीवर ट्रिपलसीट शहरात येत असताना एका क्रेनने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांपैकी धाकटा जागीच ठार तर थोरल्या भावासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात बीड बायपास रस्त्यावरील सहारा सिटीजवळ घडला. वैजिनाथ तातेराव नागरे (३०, रा. काद्राबाद) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवाजी तातेराव नागरे (३६) आणि नामदेव सुदाम गायकवाड (४२) हे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.
काद्राबाद (ता. औरंगाबाद) येथील वैजिनाथ नागरे, शिवाजी नागरे आणि नामदेव गायकवाड हे तिघे जण गवंडी काम करण्यासाठी आपल्या दुचाकी (एमएच-२०-एफझेड-३४७०) वरुन काद्राबादहून औरंगाबादकडे येत होते. बीड बायपासवरील सहारा सिटीसमोर येताच त्यांच्या दुचाकीला क्रेनने (एमएच-२०-एफजी-३८१४) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील वैजिनाथ नागरे गंभीर जखमी होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याचा मोठा भाऊ शिवाजी नागरे व नामदेव गायकवाड हे गंभीर जखमी झाले. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची कल्पना दिली. यानंतर चिकलठाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त जखमींना खासगी वाहनाद्वारे घाटीत उपचारार्थ दाखल करुन नातेवाईकांना याची माहिती कळविली. या घटनेचा पुढील तपास चिकलठाणा पोलिस तपास हे करत आहे.
वडिलांचे छत्र हरवले
आधीच घरातील परिस्थिती बेताची. त्यामुळे नागरे बंधू मिळेल ते गवंडी काम करुन कुटुंबाचा आर्थिक भार पेलायचे. पण त्यातील एकाला काळाने हिरावून नेले. वैजिनाथ नागरे याच्या पश्चात आई, पत्नी व ८ व ५ वर्षाची अशा दोन मुली आणि एक सहा महिन्याचा मुलगा आहे. वैजिनाथच्या मृत्यूमुळे या लहान मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र कायमचे हिरावले गेले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.