जळकोट - ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटून तीन जण जागीच ठार, तर बारा जण जखमी झाले. जळकोट-नंदगाव रस्त्यावर (ता. तुळजापूर) रविवारी (ता. 11) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात ठार झालेले तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. राजू मिठू राठोड (वय 35), ललिता राजू राठोड (30), स्वप्नील राजू राठोड (10, तिघेही रा. रामतीर्थ तांडा, ता. तुळजापूर) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात बारा जण जखमी झाले आहेत. जखमींना जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून या सर्वांना सोलापूरला हलविण्यात आले. धोंडीराम पूना राठोड (35), अनिता किसन पवार (35), इंदूबाई गोविंद पवार (45), प्रतीक्षा गोविंद पवार (18), पार्वती धोंडीराम पवार (33), सीमा धोंडीराम पवार (12), संदेश धोंडीराम पवार (वय पाच, सर्व रा. रामतीर्थ तांडा), मोनाली परशुराम पात्रे (12), आदित्य परशुराम पात्रे (15, रा. साठेनगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर), शोभा जालिंदर जनाने (40, रा. नंदगाव, ता. तुळजापूर), शिवाजी खेमा राठोड (55), संगीता शिवाजी राठोड (50, दोघेही रा. मानमोडी तांडा, ता. तुळजापूर) अशी जखमींची नावे आहेत. पाच वर्षांचा मुलगा बचावला या ट्रकमधून राजू मिठू राठोड, त्याची पत्नी ललिता, मुलगे स्वप्नील व कार्तिक (वय पाच) असे एकाच कुटुंबातील चार जण निघाले होते. त्यापैकी राजू, त्याची पत्नी ललिता, मुलगा स्वप्नील यांचा जागीच मृत्यू झाला. केवळ पाच वर्षांचा कार्तिक यातून बचावला आहे. |